
आयपीएलपाठोपाठ श्रेयस अय्यरला टी-20 मुंबई लीगमध्येही उपविजेतेपदावरच समाधान मानावे लागले. मयूरेश तांडेल आणि हर्ष आघवच्या तडाखेबंद भागीच्या जोरावर मुंबई फाल्कन्सने मराठा रॉयल्सपुढे 158 धावांचे आव्हान ठेवले होते. चिन्मय सुतार आणि नौशाद खानने 67 धावांची दणदणीत भागी रचत मराठा रॉयल्सला मुंबई लीगचे जेतेपद जिंकून दिले.
मुंबई फाल्कन्सचे 158 धावांचे आव्हान मराठा रॉयल्सने सहजगत्या 19 व्या षटकातच गाठले. कर्णधार सिद्धेश लाडला आज मोठी खेळी करत आली नाही. मात्र चिन्मय सुतारने कर्णधाराचे अपयश पुसून काढताना सचिन यादवसह 41 धावांची भागी रचली आणि त्यानंतर नौशाद खानच्या साथीने मराठा रॉयल्सच्या जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. चिन्मयने 49 चेंडूंत 53 धावांची संयमी खेळी केली, तर नौशादने 24 चेंडूंत 3 चौकार आणि 2 षटकार खेचत मराठाचा पाठलाग सोप्पा केला.
तांडेल-आघवची फटकेबाजी
मुंबई फाल्कन्सला अंगकृष रघुवंशी आणि इशान मुलचंदानी झंझावाती सलामी देण्यात अपयशी ठरले. रघुवंशी 7 धावांवर तर मुलचंदानी 20 धावांवर बाद झाला. कर्णधार श्रेयस अय्यर या महत्त्वाच्या सामन्यातही फार काही करू शकला नाही. त्याने 17 चेंडूंत केवळ 12 धावा केल्या. अमोघ भटकळही 16 धावांवर बाद झाला. त्यामुळे मुंबई फाल्कन्सची 12 षटकांत 4 बाद 72 अशी बिकट स्थिती होती. तेव्हा मयूरेश तांडेल (ना. 50)आणि हर्ष आघव (ना.45)यांनी मराठा रॉयल्सच्या गोलंदाजांना पह्डून काढत 8 षटकांत 85 धावा वसूल केल्या. मयूरेशने 32 चेंडूंच्या खेळीत 3-3 षटकार-चौकार लगावत नाबाद 50 धावा केल्या.