भटक्या श्वानांची दहशत; एका वर्षात 14 हजार डोंबिवलीकरांना कुत्र्यांचे चावे, तीन वर्षांत 51 हजार नागरिकांचे लचके तोडले

>> आकाश गायकवाड

कल्याण-डोंबिवलीत भटके श्वान नागरिकांसाठी जीवघेणे ठरत आहेत. पालिका क्षेत्रात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढत चालला आहे. या कुत्र्यांचा सर्वाधिक त्रास शाळकरी मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना असल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. भटक्या श्वानांची दहशत इतकी वाढली आहे की, गेल्या वर्षात 14 हजार जणांचे कुत्र्यांनी चावे घेतले आहेत. तर गेल्या तीन वर्षांत 51 हजार नागरिकांचे लचके तोडले आहेत.

कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीत सुमारे 80 हजारपेक्षा अधिक भटके श्वान आहेत. श्वान चावल्याच्या घटना रात्रीच्या वेळी अधिक आहेत. चालताना, दुचाकी किंवा रिक्षातून प्रवास करताना भटक्या श्वानांच्या हल्ल्याला नागरिक बळी पडत आहेत. त्यामुळे अनेक भागांमध्ये रात्रीचे फिरणे धोकादायक बनले आहे. शहरातील रस्ते, कचराकुंड्या, वसाहती, झोपडपट्टी आदी भागांत भटक्या कुत्र्यांचे प्रमाण जास्त आहे. कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी, चक्कीनाका, नेवाळी नाका, पत्री पूल, कल्याण पश्चिमेतील बैल बाजार, वाडेघर, खाडी परिसर, मुरबाड नाका, टिटवाळा, बल्याणी, डोंबिवलीतील एमआयडीसी भाग, मानपाडा, नांदिवली याठिकाणी सर्वात जास्त भटक्या कुत्र्यांची दहशत आहे.

मोफत उपचार केंद्रे
श्वानदंश झाल्यास महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालय, रुक्मिणीबाई रुग्णालय तसेच विविध आरोग्य केंद्रांमध्ये नागरिकांसाठी मोफत लसीकरण आणि उपचाराची सोय करण्यात आली आहे. 2022-23 मध्ये 16,414 नागरिकांना, 2023-24 मध्ये 20,390 नागरिकांना श्वानदंश झाल्याची माहिती आरोग्य निरीक्षक कमलेश सोनवणे यांनी दिली.

44 हजारांचे निर्बिजीकरण
भटक्या श्वानांवर निर्बिजीकरणाची मोहीम केडीएमसी सातत्याने राबवत आहे. 2022-23 मध्ये 14,108, 2023-24 मध्ये 14,410 आणि 2024-25 मध्ये 15,445 श्वानांचे निर्बिजीकरण करण्यात आले.