ठाणेकरांचे पाणी बिल्डरांच्या घशात; बेकायदा बांधकामासाठी वापर, शहराचा बट्ट्याबोळ, भाजप आमदाराची कबुली

एकीकडे पाण्याची प्रचंड कमतरता जाणवत असताना ठाणेकरांचे पाणी बिल्डरांच्या घशात घालून पाण्याची पळवापळवी सुरू आहे. विशेष म्हणजे नव्याने सुरू असलेल्या आणि बेकायदा बांधकामांसाठी पाण्याचा सर्रास वापर केला जात असल्याचा आरोप ठाणे शहराचे भाजपचे आमदार संजय केळकर यांनी केला आहे. दरम्यान ठाणे शहराचा बट्ट्याबोळ झाल्याची कबुलीच भाजप आमदाराने दिली असल्याने आगामी पालिका निवडणुकीत राजकीय घमासान रंगणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ठाणे शहरासह घोडबंदर, कळवा, दिवा, मुंब्रा, लोकमान्यनगर परिसरात मोठ्या प्रमाणावर बेकायदा बांधकामे सुरू आहेत. तसेच काही ठिकाणी तर नवीन इमारतीच्या पुनर्विकासाचे काम सुरू असल्याने या बेकायदा बांधकामाबाबत केळकर यांनी वारंवार आवाज उठवला आहे. ३० ३५ बेकायदा बांधकामांची यादीच प्रशासनाला देण्यात आली असून त्यावर तक्रारदाराचे समाधान करण्यात प्रशासन अपयशी ठरले असल्याचा आरोप केळकर यांनी केला आहे. न्यायालयाने कान उघडणी केल्यावरच कारवाई केली जाते. बेकायदा इमारतींना देण्यात आलेले पाणी आणि वीज तत्काळ तोडण्यात यावी, अशी मागणीदेखील केळकर यांनी केली आहे.

अधिवेशनात अधिकाऱ्यांना धडा शिकवणार
बेकायदा बांधकामांवर कारवाई होत नसल्याने केळकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना येत्या अधिवेशनात धडा शिकवण्याचा इशाराही केळकर यांनी दिला आहे. तसेच वाढत्या बेकायदा बांधकामांचा मुद्दाही अधिवेशनात उपस्थित करून कठोर कारवाईची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पाणी पुरवठ्याचे नियोजन कोसळले
शहरात पाण्याची कमतरता असून आवश्यक तेथे बोअरही खणलेल्या नाहीत. अशावेळी बांधकामेही मोठ्या प्रमाणात वाढत असून त्यांना बेसुमार पाणीपुरवठा केला जात आहे. याकरिता पाण्याची पळवापळवी करण्यात येत असल्याने अनेक भागांत पाण्याची कमतरता भासत आहे. पाणी पुरवठ्याचे नियोजन कोसळले असून याबाबत येत्या सोमवारी अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आल्याची माहिती केळकर यांनी दिली.