
महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे चिकलठाणा येथील दोन शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला. ही दुर्दैवी घटना सायंकाळी सात वाजता जुना बीड रोड, रेल्वे भुयारी मार्गाजवळ घडली.
चिकलठाणा येथील शेतकरी कचरू जनार्दन दहीहंडे (वय 50) व बाळू जगन्नाथ दहीहंडे (वय 35) यांच्या शेतातून हाय होल्टेज तारेची लाईन गेली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यामुळे यापैकी दोन तारा तुटून पडल्या होत्या. या बाबतची माहिती महावितरण कंपनीला देण्यात आली होती. महावितरण कंपनीने या तारेकडे दुर्लक्ष केले होते. तुटलेल्या तारांमध्ये विद्युतप्रवाह नाही असे सांगण्यात आले होते. मात्र, या तारांचा स्पर्श दुसऱ्या विद्युतप्रवाह असलेल्या तारेला झाला होता.
मात्र, याची कुठलीच कल्पना शेतकऱ्यांना नव्हती. त्यामुळे पेरणीपूर्व मशागतीसाठी त्यांनी या विद्युत तारा जमा करण्यास सुरवात केली. त्यातील विद्युत प्रवाहमुळे ते दोघेही चिकटले. हा प्रकार नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडा-ओरड केली. त्यावेळेस विद्युत प्रवाह खंडित करून रात्री उशीरा त्यांना बेशुद्ध अवस्थेत घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. मयत कचरु दहीहंडे यांना दोन मुले असून ते शेतीबरोबरच दूधव्यवसाय करतात. तसेच बाळू दहिहंडे यांना मुलगा मुलगी असून ते देखील शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात होते. यांच्या शेतातील विद्युत तार 15 दिवसापूर्वी तुटून पडली होती. या बाबत त्यांनी महावितरण कंपनीला वारंवार कॉल करून माहिती दिली होती. मात्र, त्यांना ‘त्यात करंट नाही’ असे सांगण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी तार वर करून मशागत केली होती. पाऊस चांगला पडल्याने मका लागवड करण्यासाठी कचरु दहीहंडे यांना मदतीला घेऊन पडलेली तार जमा करण्यासाठी गेले होते.
मात्र, अचानक या तारेमध्ये विद्युत प्रवाह आल्याने दोघेही लटकले. त्यात त्यांचा दुर्दैवी अंत झाला. महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे या शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी करत नातेवाईकांनी पोलीस ठाण्यासमोर गर्दी केली होती. रात्री उशीरापर्यंत एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यासमोर गोंधळ सुरू होता.
महावितरणच्या निष्काळजीपणामुळे चिकलठाण्यातील दोन शेतकऱ्यांचा नाहक बळी गेल्यामुळे चिकलठाणा व परिसरातील नागरिक तसेच नातेवाईकांमध्ये तिव्र संतापाची लाट उसळली आहे. या संतप्त जमावाने सोमवारी रात्री चिकलठाण्यातील हनुमान चौकात रस्ता रोको केला. या रस्ता रोकोमुळे जालना रोडवर वाहतुकीची कोंडी झाली होती.