ठाकरेंच्या उठावामुळे आमच्या लढ्याला बळ, तामीळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्याकडून कौतुक; हिंदी सक्ती खपवून घेणार नसल्याचा इशारा

‘महाराष्ट्रातील हिंदी सक्तीविरोधात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेला लढा व आजचा विजयी मेळावा कौतुकास्पद आहे. या मेळाव्यातील प्रभावी भाषणे आमचा उत्साह वाढवणारी आहेत. महाराष्ट्रातील या उठावामुळे आमच्या लढ्याला बळ मिळाले आहे,’ अशा शब्दांत तामीळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी मराठी विजयी मेळाव्याचे कौतुक केले.

मुंबईतील मराठी विजय मेळाव्यानंतर स्टॅलिन यांनी ‘एक्स’वर सविस्तर पोस्ट लिहिली आहे. ‘हिंदी सक्तीविरोधात द्रविड मुनेत्र कळघम व तामीळनाडूचे लोक पिढ्यान्पिढ्या संघर्ष करत आहेत. भाषिक अधिकारांच्या लढ्याचे हे वादळ आता राज्याच्या सीमा ओलांडून महाराष्ट्रात पोहोचले आहे. हिंदी न शिकवल्यास तामीळनाडूला निधी देणार नाही अशी अरेरावी करणाऱ्या भाजपला स्वतःची सत्ता असलेल्या राज्यात दुसऱ्यांदा माघार घ्यावी लागली आहे. आता तरी तामीळनाडूविरुद्धचे सुडाचे राजकारण केंद्र सरकार थांबवेल का, असा सवाल त्यांनी केला. निधी वाटपात होणारा दुजाभाव आम्ही सहन करणार नाही.

प्रश्नांना केंद्राकडे उत्तरेच नाहीत!

उत्तर प्रदेशात आणि राजस्थानात तिसरी भाषा कोणती शिकवली जाते?, मागासलेल्या हिंदी राज्यांची भाषा पुढारलेल्या राज्यांवर का लादत आहात? हे प्रश्न ठाकरेंनी मेळाव्यात उपस्थित केले आहेत. हिंदी व संस्कृतच्या प्रचाराला प्राधान्य देणाऱ्या केंद्र सरकारकडे याचे उत्तर असणे शक्यच नाही, असे स्टॅलिन म्हणाले. भाजपने तामीळ व तामीळनाडूशी केलेल्या विश्वासघाताचे प्रायश्चित्त घ्यावे. अन्यथा आम्ही त्यांना धडा शिकवू, असा इशारा स्टॅलिन यांनी दिला.

महाराष्ट्रातील उठावाने डोळे उघडतील!

हिंदी वर्चस्वाविरुद्ध तामीळनाडूतील लोकांचा संघर्ष केवळ भावनिक नाही तर बौद्धिक व तार्किक आहे. हिंदी लादल्यामुळे अनेक भारतीय भाषा नष्ट झाल्याचा इतिहास आहे. भारताला हिंदी राष्ट्र बनवण्याचा अजेंडा त्यामागे आहे. काही भाबडे लोक हे जाणून न घेता हिंदीची भलामण करतात. महाराष्ट्रातील उठावाने तरी त्यांचे डोळे उघडतील, अशी अपेक्षा स्टॅलिन यांनी व्यक्त केली.