
हिवाळ्यात शरीर उबदार ठेवण्यासाठी अनेक गोष्टींची गरज असते. मुख्यत्वे हिवाळ्यात आपल्या आहारामध्ये असे पदार्थ समाविष्ट करावेत, ज्यायोगे आपल्या शरीराला चांगला उबदारपणा मिळेल. हिवाळ्यात ड्रायफ्रूट खाणे हे सर्वात उत्तम मानले जाते. परंतु यामध्ये सर्वात उत्तम म्हणजे अंजीर खाणे. हिवाळ्यात अंजीर खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला खूप सारे पोषक घटक मिळतात.
अंजीर हे एक पौष्टिक कोरडे फळ आहे आणि ते लोहाचा एक उत्कृष्ट स्रोत मानले जाते. त्यात फायबर, कॅल्शियम, पोटॅशियम, बी जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट्स देखील असतात. अंजीर खाणे अशक्तपणाने ग्रस्त असलेल्यांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. ते दररोज खाल्ल्याने पचन सुधारते, अशक्तपणा कमी होतो आणि रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत होते.
अंजीर हे हिवाळ्यात खाण्यासाठी खूप चांगले मानले जातात. अंजीरमध्ये भरपूर प्रमाणात लोह असते. अंजीरमुळे अशक्तपणा कमी करण्यास, बद्धकोष्ठता दूर होण्यास आणि श्वसन प्रणाली मजबूत करण्यास देखील मदत होते.
सकाळी रिकाम्या पोटी अंजीर खायचे असतील तर ते रात्रभर भिजवून खावेत. अंजीर सकाळी सेवन केल्यामुळे, दिवसभर उर्जा टिकून राहते. तसेच रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत होते. त्याचबरोबर शरीराला उबदारपणा आणि शक्ती मिळते.

























































