‘धुरंधर’च्या सेटवर अक्षय खन्ना आणि अर्जुन रामपाल का रडले? असं काय घडलं?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘छावा’ या चित्रपटानंतर अक्षय खन्ना हा खऱ्या अर्थाने सुपरस्टार झाला. त्यानंतर ‘धुरंधर’ या चित्रपटातील अक्षयच्या अभिनयाने देखील सर्वांची मने जिंकून घेतली. ‘धुरंधर’ या चित्रपटातील अक्षय खन्नाच्या अभिनयाने एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. सोशल मीडियावर अक्षयच्या नावाचा बोलबाला सुरु झाला. परंतु ‘धुरंधर’ चित्रपटातील एक सीननंतर अक्षय खन्ना आणि अर्जुन रामपाल हे खूप रडले होते.

‘धुरंधर’ हा चित्रपट ५ डिसेंबर २०२५ ला प्रदर्शित झाला होता. चित्रपट प्रदर्शित होऊन आता तीन महिने होतील. तरीही चित्रपटाची क्रेझ अजूनही कायम आहे. चित्रपटात अशी अनेक दृश्य आहेत ज्यांबद्दल अजूनही चर्चा सुरू आहे. अलिकडेच आर. माधवनने एका मुलाखतीत खुलासा केला की, अक्षय खन्ना आणि अर्जुन रामपाल ‘धुरंधर’ मधील एका दृश्याच्या चित्रीकरणानंतर रडले होते. या दृश्यामुळे संपूर्ण युनिट दुःखी झाले होते.

सोनिया शेणॉय यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये अभिनेता आर. माधवनने खुलासा केला की, जेव्हा २६/११ चे दृश्य चित्रित झाले तेव्हा सेटवरील वातावरण हे अतिशय भावनिक झाले होते. दृश्यादरम्यान आनंद साजरा करणारे अक्षय खन्ना आणि अर्जुन रामपाल दृश्य पूर्ण झाल्यानंतर खूप रडले होते. या दृश्याबद्दल सांगताना माधवन म्हणाला, “दृश्य संपताच, दोघेही खूप रडले. जणू काही ते पूर्णपणे तुटले होते. २६/११ हा कालखंड शूट करणं त्यांच्यासाठी एक अभिनयाचा भाग होता. पण प्रत्यक्षात मात्र याच सीनने दोघांना खूप रडवलं होतं. या दृश्याने त्यांना त्या काळात परत नेले होते. तेव्हाच मला जाणवले की हा चित्रपट किती खास आहे.”

येत्या १९ मार्चला ‘धुरंधर २’ थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या दुसऱ्या भागात चित्रपटात रणवीर सिंग, अर्जुन रामपाल, आर. माधवन, सारा अर्जुन आणि गौरव गेरा यांच्याही भूमिका आहेत. या सिक्वेलचे डबिंग देखील पूर्ण झाले आहे.