
ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक आणि व्याख्याते दाजीशास्त्र्ााr पणशीकर यांचे आज ठाणे येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. 50 हून अधिक वर्षे आपल्या लेखणी व वाणीने त्यांनी समाजप्रबोधनाचे काम केले. विषयाचा व्यासंग, स्पष्टवक्तेपणा आणि परखड विवेचन ही त्यांच्या लिखाणाची व वक्तृत्वाची वैशिष्टय़े होती. साहित्यासह संगीत, नाटक, काव्य, चित्रपट अशा विविध क्षेत्रांत दाजींनी आपला ठसा उमटवला होता. त्यांच्या निधनामुळे रामायण, महाभारताचा व्यासंगी तसेच संतवाङ्मयाचा अभ्यासक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, सांगीतिक तसेच साहित्य क्षेत्राशी आपली नाळ जोडलेल्या दाजी पणशीकर यांनी स्वतःचा वाचक व श्रोतृ वर्ग तयार केला होता. गेले अर्धशतक त्यांनी या क्षेत्रांची सेवा केली. मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ नट व ‘तो मी नव्हेच’ या नाटकाने इतिहास घडवणारे निर्माते प्रभाकर पणशीकर यांच्या नाटय़संपदा या संस्थेचे व्यवस्थापक म्हणून दाजींनी अनेक वर्षे काम केले. यानिमित्ताने रंगभूमीशी संबंधित अनेक दिग्गज कलाकारांशी त्यांचा जवळून संबंध आला. त्यांचे आजोबा वासुदेवशास्त्र्ााr पणशीकर यांचा हिंदू धर्म ग्रंथ परंपरेचा वारसा त्यांनी पुढे नेला. त्यांनी देशविदेशात अडीच हजारांहून अधिक व्याख्याने दिली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, जावई, मुलगा व सून असा मोठा परिवार आहे.
दाजी पणशीकर हे गेली अनेक वर्षे टिटवाळय़ात राहत होते. 1992 साली त्यांनी काही स्थानिक कार्यकर्त्यांच्या मदतीने वासुदेवशास्त्र्ााr पणशीकर वाचनालय स्थापन केले. तसेच अनेक सांस्कृतिक व साहित्यिक कार्यक्रमही त्यांनी घडवून आणले. टिटवाळय़ानंतर ते ठाण्यातील ब्रह्मांड संकुलात राहायला आले.
‘रामायण’, ‘महाभारत’ हे ग्रंथ दाजी पणशीकर यांनी सोप्या पद्धतीने नव्या पिढीसमोर मांडले. त्यांचे ‘महाभारत एक सुडाचा प्रवास’ हे पुस्तक गाजले होते. त्याशिवाय विविध ग्रंथांच्या 30 हून अधिक आवृत्याही निघाल्या आहेत.
आज अंत्यसंस्कार
दाजीशास्त्री पणशीकर यांच्या निधनाने महाराष्ट्राचा गेल्या 50 वर्षांचा सांस्कृतिक इतिहास ज्ञात असलेले व्यक्तिमत्त्व हरपले आहे. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी सकाळी साडेनऊ वाजता जवाहर बाग वैपुंठभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
दैनिक ‘सामना’त सलग 16 वर्षे लिखाण
आचार्य अत्रे यांच्या ‘मराठा’मधील लेखमालांबरोबरच दैनिक ‘सामना’त सलग 16 वर्षे त्यांनी लिहिलेल्या विविध लेखमाला हा महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा वैचारिक ठेवा ठरला आहे. त्यांनी अनेक वर्षे संतवाङ्मयावर लिहिलेल्या लेखमालाही वाचकांच्या पसंतीस उतरल्या.