
मुंब्रा येथे झालेल्या रेल्वे अपघातात आतापर्यंत चार प्रवाशांचा मृत्यू झाला तर नऊ प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातावरून पुन्हा एकदा रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी रेल्वे मंत्र्यांना काही सवाल केले आहेत.
रेल्वेचे अनेक अपघात सध्या देशात घडत आहेत. गेल्या दोन वर्षात जेवढे अपघात झाले तेवढे या आधी कधीही झाले नव्हते. गेल्या वर्षी हजाराहून अधिक लोकांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला आहे. . रेलमंत्री वेगवेगळ्या कॉमिक आवाजात भाषणं करत आहेत. कधी वाटतं की ते रिल मंत्री झालेयत की सोशल मीडियाी इन्फ्ल्युन्सर? रेलमंत्री आहेत की रिलमंत्री आहेत. आता जे मृत्युमुखी पडले त्यांना तुम्ही नुकसानभरपाई द्याल पण इतर लोकं जी पुढेही प्रवास करणार आहेत त्यांच्या सुरक्षेचं काय? रेलमंत्री त्यावर उत्तर देतील का? असे सवाल आदित्य ठाकरे यांनी केले आहेत.
मोदी सरकारचे 11 वर्ष पूर्ण झाले आहेत. आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतो कधी ते प्रेस कॉन्फरन्स घेतात का? 11 वर्षात त्यांनी भ्रष्ट्राचार दूर केलाय का? उलट सर्व भ्रष्टाचाऱ्यांना त्यांनी भाजपमध्ये नेल. आहे. वॉशिंग मशीनमध्ये धुवून भाजपमध्ये प्रवेश दिला, असे आदित्य ठाकरे म्हणाले. यावेळी त्यांनी निवडणूक आय़ोगावरही टीका केली. ”निवडणूक आयोग म्हणजे एंटायरली कॉम्प्रमाईज्ड निवडणूक आयोग झाले आहे. इलेक्शन कमिशनचे सर्व काम भाजपच्या कार्यालयातून होतं. आम्ही इलेक्शन कमिशनला काही विचारलं की भाजप उत्तर देतेय. इलेक्शन कमिशनला तीर मारला तर यांना का झोंबतंय?, असा सवालही आदित्य ठाकरे यांनी केला.