बालमजुरी रोखण्यासाठी आणखी कठोर भूमिका गरजेची, तीन महिन्यांत 125 बालकामगारांची सुटका

खेळण्या-बागडण्याच्या, शिक्षणाचे धडे गिरविण्याच्या वयात लहानगे मजुरीच्या दलदलीत फसल्याचे सर्रास बघायला मिळतात. कामगार व पोलीस विभागाकडून बालकामगारांविरोधात वेळोवेळी कारवाया करण्यात येतात. परंतु त्या म्हणाव्या तितक्या प्रभावी नसल्याचे सामाजिक कार्यकर्ते म्हणतात. याला जनतादेखील तितकीच जबाबदार असून बालमजुरी रोखण्यासाठी आणखी कठोर भूमिका घेण्याची आवश्यकता असल्याचे ते सांगतात.

जागतिक बाल कामगारविरोधी दिनानिमित्त कामगार व पोलिसांकडून झालेल्या कारवाईचा आढावा घेतला असता आजही बालकांना मंजुरीसाठी जुंपले जात असल्याचे भयानक वास्तव पाहायला मिळते. राज्यातील सर्व जिह्यांमध्ये जिल्हाधिकाऱयांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या कृती दलांनी सन 2023 पासून मार्च 2025 पर्यंत विविध ठिकाणी 603 धाडी टाकल्या. या कारवाईत 151 बालकामगार व 186 किशोरवयीन कामगारांची सुटका करण्यात आली. तसेच मुलांना मजुरीला जुंपल्याप्रकरणी 208 आस्थापना मालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. तर जानेवारी ते मार्च 2025 या कालावधीत 148 ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. त्या कारवाईत 85 बालकामगारांची सुटका करण्यात आली, तर 80 मालकांविरोधात गुन्हे नोंदविण्यात आले होते.

मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने जानेवारी ते जून या कालावधीत 40 बालकामगारांची सुटका करून 17 गुह्यांची नोंद केली व 19 आरोपींना बेडय़ा ठोकल्या. बालकामगारांविरोधात नागरिकांनीदेखील पुढाकार घेतला पाहिजे. बालकामगार दिसल्यास तत्काळ त्याची तक्रार पोलीस अथवा कामगार विभागाकडे करावी, असे आवाहन दोन्ही विभागाकडून करण्यात आले आहे.