हे सरकार अदानी आणि निवडणूक आयोगाचं, आदित्य ठाकरे यांची टीका

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शासकीय कर्मचाऱ्यांची इमारत सावलीचा बीडीडी प्रकल्पात समाविष्ट करण्यात आली होती. आता फडणवीस सरकारने हा निर्णय मागे घेतला आहे. त्यामुळे हे सरकार अदानी आणि निवडणूक आयोगाचं आहे अशी टीका शिवसेना (उद्धव बाळसाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

आदित्य ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट करून म्हटले आहे की, महाराष्ट्राची अनेक वर्ष सेवा करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या ‘सावली’ इमारतीला भाजप सरकारची ‘सावली’ नाही पण अदानी समुहाला मात्र मुंबईत 1600 एकर भूखंडासोबत अनेक ‘सवलती’!

का? हे कोणाचं सरकार आहे? हे सरकार मराठी माणसाचं नक्कीच नाही, महाराष्ट्राचंही नाही… हे सरकार अदानी आणि निवडणूक आयोगाचं आहे! उद्धवसाहेबांच्या सरकारच्या काळात सरकारने ‘सावली‘ इमारतीचा बीडीडी प्रकल्पात समावेश करून घेतला होता. त्याअंतर्गत रहिवाशांना 500 चौरस फूटांची घरं मिळणार होती पण भाजप सरकारने मात्र हा निर्णय गुपचूप उलटवला आहे.

आता प्रश्न आहे, वरळी, एन.एम. जोशी मार्ग आणि वडाळा बी.डी.डी. चाळीत राहणाऱ्या पोलिस परिवारांचा!त्यांना तरी हे सरकार घरं देणार आहे का? की इथेही जुमलाच करणार? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.