
अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर-हातोला रस्त्यावर लिमगाव पाटीजवळ शनिवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला, तर एक तरुण गंभीर जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हातोला येथील अभय सतीश चव्हाण (वय – 25) आणि ऋषिकेश अशोक चव्हाण (वय – 18) हे दुचाकीवरून बर्दापूरहून हातोलाकडे जात असताना लिमगाव पाटीजवळ दोन दुचाकींची धडक झाली. या भीषण अपघातात अभय चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला, तर ऋषिकेश चव्हाण गंभीर जखमी असून त्याच्यावर अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, समोरून येणाऱ्या दुचाकीवरील दोघेही तरुण या अपघातात जागीच ठार झाले आहेत. त्यांची नावे अद्याप स्पष्ट होऊ शकलेली नसली, तरी ते पानगाव येथील असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या अपघाताची माहिती मिळताच बर्दापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, पुढील तपास सुरू आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमीला तत्काळ रुग्णालयात हलवण्यात आले.