ही विजयाची पहिली पायरी! आमची भूमिका स्पष्ट, मुंबईसह महाराष्ट्र काबीज करणे!! संजय राऊत यांचे मोठे विधान

मराठी माणसाच्या एकजुटीने हिंदी सक्तीचा निर्णय रद्द झाला. ही विजयाची पहिली पायरी आहे. आता आम्हाला एकत्र येऊन अनेक विजय प्राप्त करायचे आहेत, असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत सोमवारी सकाळी पत्रकार परिषदेत बोलताना केले.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची भूमिका पहिल्या दिवसापासून स्पष्ट आहे. ज्या दिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकत्र येण्याची साद घातली, त्यानंतर पुढल्या दहा मिनिटात उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. सकारात्मक प्रतिसाद नसता तर हिंदी सक्तीच्या सरकारच्या भूमिकेविरोधात आम्ही एकत्र आलोच नसतो. मराठीच्या प्रत्येक लढ्यात आम्ही एकत्र असून आमची भूमिका स्पष्ट आहे, मुंबईसह महाराष्ट्र काबीज करणे. मराठी माणसाच्या हातात मुंबईसह महाराष्ट्राची सत्ता असावी ही आमची भूमिका आहे, असेही संजय राऊत म्हणाले.

फडणवीस भाजपच्या राष्ट्रीय धोरणानुसार खोटं बोलताहेत!

देवेंद्र फडणवीस यांनी माशेलकर अहवालाच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्याबाबत गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला. याचा समाचार घेत राऊत म्हणाले की, फडणवीस अफवा पसरवत नाही, तर भाजपच्या राष्ट्रीय धोरणानुसार खोटे बोलत आहेत. जसे मोदी-शहा बोलतात, तसे राज्यातील नेते खोटे बोलतात. माशेलकर अहवाल काय आहे हे त्यांनी टेबलावर ठेवावे, ते मुख्यमंत्री असून त्यांना कुणी अडवले. ते हवेत तीर मारत आहेत. तुम्ही नरेंद्र जाधव समिती का स्थापन करत आहात? एखादा जटिल विषय आल्यावर त्याच्यावर समिती नेणे ही शासनाची एक पद्धत असते. मुख्यमंत्री किंवा मंत्रिमंडळ प्रत्येक विषयात तज्ज्ञ नसतात. त्यासाठी इतर तज्ज्ञांची मदत घेऊन निर्णय घ्यायचा असतो, असेही राऊत म्हणाले.

फडणवीस-प्रफुल्ल पटेल, फडणवीस-मुश्रीफ एकत्र येत असेल तर…

उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असल्याने फडणवीस अस्वस्थ झाले आहेत. त्यांच्या शुभेच्छावर मराठी माणसाची एकजूट ठरत नाही. फडणवीस-प्रफुल्ल पटेल, मिंधे एकत्र येऊ शकतात. फडणवीस-मुश्रीफ एकत्र येऊ शकत असतील तर दोन भाऊ एकत्र येण्यात तुम्हाला कसली पोटदुखी आहे? सरकार बनवण्यासाठी तुम्ही जे काही भ्रष्ट कडबोळे एकत्र केले त्यावर व्यक्त व्हा. दोन ठाकरे बंधू, एकाच विचाराचे नेते एकत्र येतायत त्यामुळे तुम्ही अस्वस्थ होताय. तुम्हाला वैफल्य आले आहे की, आपले काय होणार हे स्पष्ट दिसतंय, असा टोला राऊत यांनी लगावला.

ठाकरे बंधुंच्या एकत्रित मोर्चाचा सरकारनं धसका घेतला, मराठी माणसाची एकजूट बघून हिंदी सक्तीचा निर्णय मागे! – संजय राऊत

कोण संपले, कोण टिकले हे येणारा काळ ठरवेल

कधीकाळी एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांना सगळ्यात भ्रष्ट नेता म्हणत होते. देवेंद्र फडणवीस हे अजित पवारांना तुरुंगात टाकायला निघाले होते. नरेंद्र मोदी प्रफुल्ल पटेल यांना दाऊदचा हस्तक म्हणत होते. भूतकाळात जायला लावू नका. कोण संपले, कोण टिकले हे येणारा काळ ठरवेल, असेही राऊत यावेळी म्हणाले.