
एक जिद्दी माणूस धनगर वाडय़ासारख्या पठारावर शेती करून नानाविध प्रयोग करतो. सामाजिक कार्याबरोबरच मत्स्यप्रकल्प साकारून तो यशस्वी होण्यासाठी अपार कष्ट घेतो. मात्र, घास तोंडात जाण्यापूर्वीच तो हिरावला गेल्याच्या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. तालुक्यातील म्हासुर्ली पैकी मलगुंडे धनगरवाडा येथील एका शेतकऱयाच्या शेततळ्यात मृत माशांचा खच पडला असून, माशांचा नेमका कशामुळे मृत्यू झाला? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
एकतर फूड पॉयझन किंवा अज्ञात इसमाने जाणूनबुजून विषारी पदार्थ टाकल्यामुळे हा प्रकार घडल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. यामध्ये शेतकऱयाचे प्रचंड नुकसान झाले असून, या घटनेमुळे तळय़ातील पाणीही दूषित झाल्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे.
राधानगरी तालुक्यातील म्हासुर्ली पैकी मलगुंडे धनगरवाडा येथे धोंडीराम मलगुंडे यांचे गट नंबर 453 मध्ये 16 गुंठय़ांत शेततळे असून, त्यात त्यांनी मत्स्यपालन केले आहे. दीड वर्षांपूर्वी त्यांनी रोहू, कटला जातीचे मासे शेततळ्यात सोडले होते. माशाची साईज एक ते दीड किलोप्रमाणे असून, त्यांची पूर्ण वाढ झालेली होती. मात्र, आज मलगुंडे हे माशांना खाद्य टाकण्यासाठी शेततळ्यावर गेले असता तळय़ात मृत माशांचा खच पाहून हादरून गेले. शेततळय़ात मासे मृत होऊन तरंगलेल्या अवस्थेत त्यांना दिसून आले.
या ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात आले असून, त्यादृष्टीने तपासणी सुरू आहे. याबाबत तलाठी, पोलीस पाटील व पशुवैद्यकीय अधिकारी यांनी घटनेचा पंचनामा केला आहे.
दरम्यान, शेततळ्यात माशांचा मृत्यू झाल्यानंतर मलगुंडे यांनी एफबीआय फॉरेन्सिक लॅब कोल्हापूर येथील तज्ञांकडे आपल्या शेततळ्यातील पाणी आणि मासे तपासणीला पाठविले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतरच याबाबतचे कारण स्पष्ट होणार आहे. याबाबत पोलिसांत तक्रार नोंदविण्यात आली नसून, अहवाल आल्यानंतरच तक्रार देणार असल्याचे मलगुंडे यांनी सांगितले.