
बलात्कार आणि हत्येप्रकरणी 12 वर्षांची शिक्षा भोगल्यानंतर निर्दोष सुटलेल्या व्यक्तीच्या नुकसानभरपाईच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने संमती दिली आहे. या व्यक्तीला सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. मुंबई हायकोर्टानेही त्याची फाशी कायम ठेवली होती. सर्वोच्च न्यायालयाने मात्र त्याची सुटका केली. त्यानंतर या व्यक्तीने बेकायदेशीर अटक, खोट्या पुराव्याच्या आधारे चालवलेला खटला आणि शिक्षा याबद्दल नुकसानभरपाई भरपाई मिळावी म्हणून याचिका दाखल केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि संदीप मेहता यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सोमवारी सुनावणी झाली. खंडपीठाने त्याच्या याचिका स्वीकारत या प्रकरणी अॅटॉर्नी जनरल आणि सॉलिसिटर जनरल यांच्याकडे मदतीची अपेक्षा केली. हे 2013 सालचे ठाणे जिह्यातील प्रकरण आहे. आरोपी मूळचा उत्तर प्रदेशातील आहे.



























































