विमान अपघातानंतर Air India चा मोठा निर्णय; विमानांच्या आंतरराष्ट्रीय सेवात 15 टक्क्यांनी कपात

अहमदाबादमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या विमान अपघातानंतर संपूर्ण देश हळहळला होता. या अपघाताचा परिणाम एअर इंडियावरही दिसून आला. आपघात झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून एअर इंडियाची अनेक उड्डाणे रद्द झाली. त्यामुळे विविध विमानतळांवर शेकडो प्रवाशांना बिघाडाच्या गोंधळाचा मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे टाटा ग्रुप एअरलाइन कंपनीने बुधवारी एक मोठा निर्णय घेतला आहे. वाइडबॉडी विमानांची आंतरराष्ट्रीय सेवा 15 टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे.

दिवसभरात सात विमान उड्डाणे रद्द! एअर इंडियाचे दिवस फिरलेत

एअर इंडिया दररोज सुमारे 70 आंतरराष्ट्रीय उड्डाणे त्यांच्या वाइड-बॉडी विमानांच्या ताफ्यातून चालवते. अशातच एअर इंडियाने दिवसभरात बोइंग ड्रीमलायनरसह सात आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द केली. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. अशातच एअर इंडियाने वाइडबॉडी विमानांची आंतरराष्ट्रीय सेवा 15 टक्क्यांनी कपात करण्याचा निर्णय घेतला. ऑपरेशन्सची स्थिरता राखण्यासाठी, चांगली कार्यक्षमता आणि प्रवाशांची गैरसोय कमी करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

विमानांची ही कपात आता 20 जूनपासून लागू केली जाईल. किमान जुलैच्या मध्यापर्यंत ही कपात सुरू राहील. या काळात एअर इंडियाकडे कोणत्याही कठीण प्रसंगासाठी राखीव विमाने उपलब्ध असतील, असे एअर इंडियाने म्हटले आहे.

विमान सुरक्षा हवेतच! सरकारी संस्थांमध्ये 5 हजारांहून अधिक पदे रिक्त

एअरलाइनच्या या निर्णयामागे अनेक महत्त्वाची कारणे आहेत. अलिकडेच पाश्चात्य देशांकडे जाणाऱ्या मार्गांवर हवाई क्षेत्र बंद झाल्यामुळे उड्डाणाचा वेळ वाढला आहे. ज्यामुळे विमानांच्या उपलब्धतेवर परिणाम झाला आहे. तसेच गेल्या गुरुवारी अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमान एआय 171 च्या अपघातानंतर बोईंग 787 विमानांच्या सुरक्षा तपासणी तीव्र करण्यात आल्या आहेत. ज्यामुळे या विमानांची उड्डाण क्षमता मर्यादित झाली आहे. यांसारख्या काही महत्त्वाच्या कारणांमुळे एअर इंडियाने हा निर्णय घेतला असल्याची शक्यता आहे.