
IPL 2025 चा अंतिम सामना 3 जून 2025 रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) पंजाबचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. बंगळुरूविरुद्ध कोण खेळणारे हे पुढील दोन सामन्यांच्या निकालानंतर समजेलच. परंतु अंतिम सामन्यासाठी BCCI ने जोरदार तयारी केली आहे. तसेच Operation Sindoor चा विजय साजरा करण्यासाठी एक कार्यक्रम सुद्धा आयोजित केला आहे. यासाठी BCCI ने हिंदुस्थानच्या तिन्ही दलांच्या प्रमुखांना सुद्धा आमंत्रित केलं होतं. परंतु BCCI च्या आमंत्रणाला तिन्ही दलांच्या प्रमुखांनी नकार दिल्याची बातमी समोर आली आहे.
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप नागरिकांचा बळी गेला. त्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर हिंदुस्थानने “ऑपरेशन सिंदूर” राबवत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर काही दिवस दोन्ही देशांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव आयपीएल काही दिवसांसाठी स्थगित केली होती. त्यामुळे आयपीएलच्या वेळापत्रकातही बदल झाला. आयपीएलची अंतिम फेरी ही 25 मे रोजी खेळली जाणार होती, मात्र वेळापत्रकात बदल झाल्यामुळे आता ती 3 जून रोजी खेळली जाणार आहे. या सामन्यात BCCI ने तिन्ही दलाच्या प्रमुखांना म्हणजेच लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी, नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश के त्रिपाठी, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंग आणि इतर प्रमुख अधिकारी आणि जवानांना आमंत्रित केलं होतं. परंतु तिन्ही दलांचे प्रमुख फायनलचा सामना पाहण्यासाठी उपस्थित राहणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. परंतू BCCI चा ऑपरेशन सिंदूर शी संबंधित पूर्वनियोजीत कार्यक्रम ठरल्याप्रमाणे पार पडणार आहेत. NDTV हिंदीने यासंदर्भात वृत्त दिले आहे.