
मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात सध्या क्षमतेपेक्षा जास्त कैदी आहेत. या तुरुंगाची क्षमता ही 999 इतकी आहे. पण या तुरुंगात सध्या 3 हजार 461 कैदी आहेत. याच तरुंगातील आरोपीने आपल्या सुरक्षिततेसाठी दुसऱ्या तुरुंगात हलवण्यात यावे अशी मागणी केली होती. तेव्हा ही बाब समोर आली आहे.
1993 मुंबई स्फोट प्रकरणातील आरोपी मुन्नाफ हलारी याने अंडा सेलमध्ये आपल्याला हलवण्यात यावं अशी मागणी केली होती. सर्वसामान्य कैद्यांसोबत असताना प्रतिस्पर्धी टोळ्यांकडून आपल्याला जिवाचा धोका आहे असा दावा हलारी याने केला आहे. पण कोर्टाने हलारीची मागमी फेटाळून लावली आहे. तसेच हलारीला इतर विभागत ठेवून पुरेशी सुरक्षा द्या असे आदेश कोर्टाने पोलिसांना दिले आहेत.
मुन्नाफ हलारीला 29 फेब्रुवारी 2020 रोजी अटक झाली होती आणि तो सुरुवातीला साबरमती जेलमध्ये होता. नंतर 2 जून 2025 रोजी त्याला मुंबईत हलवले गेले. सरकारी वकिलाने सांगितले की, एखाद्या आरोपीला अंडा सेलमध्ये जास्त काळ ठेवल्यास महाराष्ट्र तुरुंग नियमांचे उल्लंघन होईल आणि याबाबत आपण अधीक्षकाकडून अहवाल मागविण्यात आल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले. अधीक्षकांनी कोर्टात सांगितले की, सामान्य विभागाप्रमाणे जास्त सुरक्षा असलेल्या सेलमध्येही कैद्यांची प्रचंड गर्दी झाली आहे. हा सेल 31 कैद्यांसाठी आहे, पण सध्या तेथे 43 कैदी आहेत, त्यात बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी, दहशतवादी कारवायांतील गुन्हेगार आणि प्रसाद पुजारी, उदय पाठक यांसारखे टोळी प्रमुख असल्याचे त्यांनी सांगितले.
अधीक्षकांनी म्हटले की, अंडा सेलमध्ये हलारीला ठेवणे अधिक धोका निर्माण करू शकतो आणि त्याच्या सुरक्षिततेसाठी तो वेगळ्या विभागात ठेवणेच योग्य राहील, जसे की इतर सह-आरोपींसोबत केले आहे. कोर्टाने या सगळ्या बाबींचा विचार करून, तुरुंगातील गर्दी व धोका लक्षात घेतला आणि सांगितले की, तुरुंग प्रशासन व अधीक्षकच कैद्यांची सुरक्षितता ठरवण्यात सर्वाधिक सक्षम आहेत आणि त्यांनीच योग्य उपाय करावेत.