भटकंती – देवभूमीतले क्रिकेट

>> निमिष पाटगावकर

माझ्या कॉर्पोरेट आणि क्रिकेट या दोन `क’च्या निमित्ताने मला जगातली उत्तम ठिकाणे बघायची संधी मिळाली. कधी कधी सर्व जग बघितले जाते आणि लक्षात येते की आपला भारतच पूर्ण बघायचा राहून गेला आहे. भारतातली विविधता बघायला खरं तर एक जन्म पुरणार नाही इतके वैविध्य आहे, पण या विविधतेची झलक मला पहिल्यांदा जाणवली 2023 च्या भारतातल्या विश्वचषकात. भारताचे सामने भारताच्या कानाकोपऱ्यात नऊ ठिकाणी असल्याने विमानाने का होईना, पण 2200 किलोमीटरची भटकंती झाली. मुंबई, चेन्नई, कोलकाता, दिल्ली, अहमदाबाद, पुणे, लखनऊ, बंगळुरू ही मोठी शहरे सामन्यांची ठिकाणे होतीच, पण या सर्व ठिकाणांहून मला जास्त आकर्षण होते ते धर्मशालाचे.

मुंबईहून थेट विमानाचे तिकीट वेळेत काढले तर ठीक आहे पण सिझनमध्ये ते अवाच्या सवा असते. मला तर विश्वचषकाच्या धामधूमीत तिकीट काढायचे होते. पण ते तिकीट प्रचंड महाग असल्याने मी चंदिगढला मुंबईहून विमानाने जायचे ठरवले आणि तिथून पुढे गाडीने धर्मशाला गाठायचे ठरवले. चंदिगढच्या सुंदर नियोजनबद्ध शहरातून वाट काढत माझी गाडी जेव्हा हायवेला लागली तेव्हा या पट्टय़ातली सुजलाम सुफलाम भूमी दिसायला लागली. वाटेत एका मोठय़ा पंजाबी धाब्यावर जंबो पराठा खाऊन आमची गाडी आता निसर्गाच्या कुशीत शिरत होती. हा रस्ता इतका सुंदर होता की मी ड्रायव्हरला बाजूला बसवून गाडी चालवायचा मोह आवरू शकलो नाही. धर्मशालाला पोहोचायच्या आधीच ते किती सुंदर असेल याची कल्पना यायला लागली होती. जेव्हा या छोटय़ा शहरात प्रवेश केला तेव्हा लक्षात आले जिथे बघावे तिथे फक्त सुंदरताच आहे. आपली पाठराखण करणारी हिमाच्छादित बर्फशिखरे सदोदित दृष्टीस पडतात. माझे हॉटेल शहराच्या मध्यवर्ती भागात होते तरी हॉटेलच्या रूममधून पर्वत शिखरे सहज दिसत होती.

इथले क्रिकेट स्टेडियम म्हणजे एक अजब प्रकार आहे. भगीरथाने कठोर मेहनतीने जशी हिमालयातून गंगा आणली त्याप्रमाणे हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनने कठोर मेहनतीने हिमालयात क्रिकेट वसवले. हिमालयाच्या धौलाधार पर्वतरांगा कोरून हे स्टेडियम बनवले आहे. आऊटफिल्डच्या पलीकडे दिसणाऱ्या हिमाच्छादित शिखरांच्या पार्श्वभूमीवर इथे क्रिकेट बघणे हा असामान्य अनुभव आहे. स्टेडियमच्या पाठच्या पर्वतरांगा रात्रीच्या गारठय़ाने सकाळी हिमवर्षावाचे पातळ जॅकेट घालून उभ्या असतात. दुपारी उन्हे वर आल्यावर ते जॅकेट उतरवून आपले मूळचे भव्य रूप दाखवतात तर संध्याकाळी सूर्यास्ताच्या सोनसळी किरणांचा अभिषेक झाल्यावर विधात्याच्या कलाकुसरीने आपण थक्क होतो. इथल्या प्रेक्षकांना समोर चौकार-षटकारांची आतषबाजी बघायची का मागची निसर्गसौंदर्याची उधळण बघायची हा मोठा प्रश्न असतो.

दिवस-रात्र सामन्यात सूर्यास्ताबरोबर निसर्गाचा शो संपला की इथे मानवनिर्मित शो चालू होतो. इथले मीडिया सेंटर आणि समोरचे पॅव्हिलियन सुंदर पॅगोडासारख्या कळसांचे आहे तिथे लाल गुलाबी रंगांचा खेळ चालू होतो. तिबेटीयन संस्कृतीला हक्काचे माहेर इथे मॅकलोडगंजला आहे. त्या संस्कृतीचे प्रतीक म्हणून हे कळस आहेत का माहीत नाही. रात्रीच्या अंधारात हे कळस कधी धीरगंभीर पॅगोडाची आठवण करून देतात तर त्यातले लाइट्सचा रंगीबेरंगी शो चालू झाला की तेच कळस डिस्नेलँडच्या प्रिन्सेस कॅसलची आठवण करून देतात. या रंगोत्सवात रात्रीच्या प्रहरात समोरचा सामना हा स्वप्नवत वाटायला लागतो. कधी कधी सामना चालू असताना मैदानात ढग उतरतात. क्रिकेटचा सामना पाऊस, अपुऱ्या प्रकाशाने थांबवला जाणे नवीन नाही. पण मैदानात ढग उतरल्याने सामना थांबवला जाणारे हे जगातील एकमेव ठिकाण असावे.

सामन्याच्या आधी मी मॅकलोडगंजच्या दलाई लामा मंदिरात जाऊन आलो. मंदिर म्हणजे मनशांती आणि पवित्रता असा अर्थ असेल तर तो इथे दिसतो. मंदिराबाहेरचा आणि दर्शनासाठी कुठलाही आतला बाजारूपणा नसलेले हे भव्य मंदिर आहे. बौद्ध भिख्खू एका मोठय़ा सभागृहात पठण करत असतात आणि तुम्ही कसलाही आवाज न करता कितीही वेळ ही मनशांती अनुभवू शकता. इथे इच्छापूर्तीसाठी मंत्र लिहिलेली गोल फिरणारी सिलिंडरसारखी पो आहेत. मीही ती गोल फिरवून माझी इच्छा व्यक्त केली.

इथून जवळच असलेल्या लायब्ररी ऑफ तिबेटियन वर्क्स अँड अर्काइव्हज या ग्रंथालयात हजारो दुर्मिळ हस्तलिखिते आहेत. पाचव्या शतकात नालंदा विद्यापीठात अनेक दुर्मिळ संस्कृत ग्रंथांचे जतन केले होते. तिबेटीयन अभ्यासक जेव्हा तिथे गेले होते तेव्हा त्यांनी त्यांनी अनेक संस्कृत ग्रंथांचे भाषांतर तिबेटीयन भाषेत केले होते. पुढे तेराव्या शतकात नालंदा विद्यापीठावर आाढमण झाले तेव्हा ही संस्कृत हस्तलिखिते नष्ट झाली. काही तिबेटियन लोकांनी वाचवले आणि आपल्याबरोबर नेली. मूळ संस्कृत ग्रंथांचे सर्वात अचूक भाषांतर या तिबेटियन अभ्यासकांनी केले होते, तेव्हा या भाषांतराचा उपयोग मूळ संस्कृत ग्रंथ पुन्हा लिहिण्यासाठी झाला. पुढे जेव्हा 1959 ला चीनने तिबेटवर कब्जा केल्यावर हे बौद्ध भिख्यू हे सर्व दस्तऐवज घेऊन पळाले. कुणी भूतान, नेपाळ, जपान तर कुणी भारतात आश्रयाला आले. दलाई लामांनी हे सर्व ऐतिहासिक ग्रंथ एकत्र आणायला या लायब्ररीची स्थापना केली. आज इथे ते पुन्हा या ग्रंथालयात एकत्र आणले जात आहेत. इथे 80000 दुर्मिळ हस्तलिखिते, 10000 चित्रे आणि 600 बौद्धकालीन विशिष्ट चित्रे असा बाराव्या तेराव्या शतकातील ठेवा आहे.

हिमाचल प्रदेश म्हणजे देवभूमी. या देवभूमीत क्रिकेटच्या मैदानावरच्या देवांचा सामना बघणे म्हणजे काय सुख आहे हे बघायला तुम्हाला एकदा इथे जायलाच हवे.

[email protected]