
>> डॉ. सुरेश जोशी
कोकणच्या रत्नागिरी जिह्यातील संगमेश्वरमधील लेखक जे. डी. पराडकर यांचे ‘मंतरलेले दिवस’ हे पुस्तक दिल्ली येथील 98 व्या मराठी साहित्य संमेलनात प्रकाशित झाले. पुणे येथील चपराक प्रकाशनने प्रकाशित केलेले पराडकर यांचे हे सलग दहावे पुस्तक आहे.
बालपणाचा काळ सुखाचा…! अशी एक स्मरणरंजन परंपरा शब्दबद्ध करण्याचा सराव आता मराठी ललितगद्य दालनात चांगलाच रुजला आहे. सभोवतालच्या भोवतालास आणि घर अंगणास भावपूर्णतेने तर कधी भावुकतेने रंगवता रंगवता आपली वडील माणसे, पाळीव प्राणी तसेच वृक्षवल्लीही अशा गद्य लेखनात समूर्त होऊन साकारतात तेव्हा वाचन रोचक होते. अशी अनुभूती कोकणचे लेखक जे. डी. पराडकर यांच्या ‘मंतरलेले दिवस’ या पुस्तकाच्या वाचनातून येते. बालपणी भयभीत कुतूहल वाढवणारी ‘छबिना’सारखी गाव परंपरा असो अथवा गडद अंधारात लख्ख प्रकाशाने उजळणारी ‘बत्ती’सारखी नित्याची वस्तू, गतकालीन माणसांच्या आठवणी हुरहूर लावून जातात. पराडकर यांचे पाळीव प्राण्यांचे प्रेम म्हणजे तर जणू बालसवंगडीच! ‘मंतरलेले दिवस’ या पुस्तकाला कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधुभाई मंगेश कर्णिक यांची प्रस्तावना लाभणं हा लेखक म्हणून जे. डी. पराडकर यांच्या लेखणीचा खूप मोठा सन्मान आहे. आपल्या प्रस्तावनेत मधुभाई म्हणतात की, कोकणवर मी विपुल लेखन केलं, मात्र पराडकर यांनी ‘मंतरलेले दिवस’ या पुस्तकातून मला नव्याने कोकण दाखवलं.
मंतरलेले दिवस
प्रकाशक ः चपराक प्रकाशन, पुणे
संपादक ः घनश्याम पाटील पृष्ठे ः 120