
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) 18 वर्षांनी आयपीएलचे विजेतपद पटकावले. त्यामुळे खेळाडूंसह चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी संपूर्ण संघ बंगळुरूमध्ये दाखल झाला, तेव्हा खेळाडूंना आणि विशेष करुन विराट कोहलीला पाहण्यासाठी मोठ्या संख्येने चाहत्यांनी चहूबाजूंनी गर्दी केली होती. मोठ्या संख्येने चाहते आल्याने एकच गर्दी उसळली आणि चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी एका स्थानिक नागरिकाने टीम इंडिया आणि विराट कोहलीवर कारवाईची मागणी केली आहे. तसेच विराट कोहलीविरोधात तक्रार दाखल केली आहे.
मंगळवारी पंजाब किंग्जविरुद्ध झालेल्या अटीतटीच्या लढतीत RCB ने PBKS चा 6 धावांनी पराभव करत IPL 2025 चे विजेतेपद पटकावले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी संपूर्ण संघ बंगळुरूत दाखल झाला. प्रथम विधानसभा परिसरात कर्नाटक सरकारने त्यांचा सत्कार केला आणि त्यानंतर संपूर्ण संघ चिन्नास्वामी स्टेडियमवर पोहोचला. दोन्ही ठिकाणी चाहत्यांनी एकच गर्दी केली होती. पोलिसांना गर्दीवर ताबा मिळवणं कठीण झालं आणि चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत 11 जणांचा जीव गेला आणि 50 जण जखमी झाले आहे. त्यानंतर सर्व स्तरातून RCB वर टिका होऊ लागली. कर्नाटक सरकारने RCB मॅनेजमेंट, कर्नाटक क्रिकेट संघाला आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी DNA ला दोषी ठरवलं. त्यानंतर क्यूबन पार्क पोलिसांनी चार लोकांना ताब्यात घेतलं आहे. आता स्थानिक व्यक्ती एचएम वेंकटेशने विराट कोहलीविरोधात क्यूबन पार्क पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.