Operation Sindoor – हिंदुस्थाननं काही लढाऊ विमानं गमावली; संरक्षण सल्लागाराची कबुली, दूतावासाचं स्पष्टीकरण

पहलगाम हल्ल्यानंतर हिंदुस्थानने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवादी तळ नष्ट केले. या हल्ल्यावेळी हिंदुस्थानने काही लढाऊ विमानं गमावली, असे विधान हिंदुस्थानचे इंडोनेशियातील संरक्षण सल्लागार (Deffence attache) कॅप्टन शिव कुमार (नौदल) यांनी केले. ते एका कार्यक्रमामध्ये बोलत होते. यामुळे एकच खळबळ उडाली असून विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरत हिंदुस्थान-पाकिस्तान युद्धातील नुकसानीबाबत स्पष्ट माहिती न देणाऱ्या मोदी सरकावर हल्ला चढवला. यानंतर जकार्तातील हिंदुस्थानी दूतावासाने स्पष्टीकरण देत त्यांच्या विधानाचा माध्यमांनी चुकीचा आणि सदर्भहिन अर्थ काढल्याचे म्हटले. ‘इंडिया टूडे‘ने याबाबत वृत्त दिले आहे.

जकार्ता येथे 10 जून रोजी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात इंडोनेशियातील हिंदुस्थानचे संरक्षण सल्लागार कॅप्टन शिव कुमार यांनी ऑपरेशन सिंदूर दरम्यान दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करताना हिंदुस्थानच्या हवाई दलाने काही विमाने गमावली असे विधान केले. हिंदुस्थानी लष्कराला पाकिस्तानच्या सैन्यच्या पायाभूत सुविधा आणि हवाई दलाला लक्ष्य न करण्याचे निर्देश देण्यात आले होते. या राजकीय निर्बंधांमुळे हवाई दलाला ऑपरेशन सिंदूरच्या सुरुवातीला काही लढाऊ विमानं गमवावी लागली, असेही ते म्हणाले.

‘ऑपरेशन सिंदूरच्या सुरुवातीला झालेल्या नुकसानीनंतर हिंदुस्थानी सैन्याने आपली रणनीती बदलली आणि पाकिस्तानच्या सैन्यालाही धडा शिकवला. आम्ही आधी शत्रूची हवाई संरक्षण यंत्रणा नष्ट केली आणि नंतर ब्रह्मोस क्षेपणास्त्रचा वापर करून प्रभावी हल्ले केले’, असेही कॅप्टन शिव कुमार यांनी सांगितले.

कॅप्टन शिव कुमार यांच्या वक्तव्याचा दाखल देत काँग्रेसने मोदी सरकारवर ताशेरे ओढले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी या प्रकरणात पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठक घेऊन विरोधी पक्षाला विश्वास घेण्याची मागणी केली. तसेच संसदेच्या विशेष अधिवेशनाची मागणी का फेटाळण्यात आली? असा सवालही त्यांनी केला. तर दुसरीकडे काँग्रेस नेते पवन खेरा यांनी मोदी सरकार आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड केल्याची टीका केली. याआधी सीडीएस जनरल अनिल चौहान यांनीही ऑपरेशन सिंदूरच्या सुरुवातीच्या टप्प्यात नुकसानाची कबुली दिली होती, याचाही उल्लेख खेरा यांनी केला.

आमची विमाने पडली कशी? हे महत्त्वाचे! सीडीएस अनिल चौहान यांच्या विधानाने खळबळ

दूतावासाचे स्पष्टीकरण

संरक्षण सल्लागारांनी एका कार्यक्रमाबाबत केलेल्या विधानांचे वृत्त माध्यमात झळकले. त्यांच्या म्हणण्याचा माध्यमांनी चुकीचा अर्थ काढला. हिंदुस्थानची सशस्त्र दले राजकीय नेतृत्वासोबत काम करतात, इतर शेजारच्या देशांसारखे नाही. हे देशाच्या लोकशाही परंपरेचे प्रतिबिंब असल्याचे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. ऑपरेशन सिंदूरचा उद्देश फक्त दहशतवादी तळे नष्ट करण्याचा होता, असे जकार्ता दूतावासाने स्पष्ट केले.