
टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना सर्व गडीबाद 471 धावा केल्या आहेत. यशस्वी जैसवाल (101), केएल राहुल (42), शुभमन गिल (147) आणि ऋषभ पंत (134) यांच्या व्यतिरिक्त इतर फलंदाजांना लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही.
टीम इंडियाच्या 430 धावसंख्येवर चार विकेट गेल्या होत्या. त्यामुळे टीम इंडिया 500 चा आकडा सहज पार करेल, असं सर्वांनाच वाटलं होतं. शुभमन गिल बाद झाल्यानंतर टीम इंडियाची गाडी रुळावरुन घसरली आणि पुढील फक्त 31 धावांमध्ये टीम इंडियाचे फलंदाज एकामागोमाग एक तंबुत परतले. पहिलाच सामना खेळणाऱ्या साई सुदर्शन आणि आठ वर्षांनी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या करुण नायरकडून संघासह चाहत्यांना चांगल्या खेळाची अपेक्षा होती. परंतु दोघेही शुन्यावर बाद झाल्याने संघाच्या अडचणी वाढल्या. त्यानंतर एकाही फलंदाजाला मैदानावर टिकून राहता आले नाही. इंग्लंडकडून कर्णधार बेन स्टोक्स आणि जोश टंग यांनी सर्वाधिक 4-4 विकेट घेतल्या. तर ब्रायडन कार्से आणि शोएब बशीर यांनी 1-1 विकेट घेतली.