
>>संजय कऱ्हाडे
अॅण्डरसन-तेंडुलकर चषकाच्या पहिल्या कसोटीदरम्यान इंग्लंडचा पहिला डाव पाहताना दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी मला वासू परांजपेंची आठवण येत होती. दुसऱ्या दिवशी रवींद्र जाडेजा आणि यशस्वी जैसवालने झेल सोडले. मोहम्मद सिराजने मागे धावत जाऊन अप्रतिम झेल घेतला खरा, पण बुमराच्या नो-बॉलवर! तिसऱ्या दिवशी पंत अन् पुन्हा जैसवालने झेल सोडले.
अखेर काल तिसऱ्या दिवशी रवींद्र जाडेजा आणि साई सुदर्शनने मिळून जेमी स्मिथचा सीमारेषेवर घेतलेला झेल पाहून वासूंचे शब्दच कानात घुमले. ते नेहमी म्हणायचे, ‘‘पॅच हातात, मॅच खिशात.’’
मात्र तोपर्यंत हिंदुस्थानच्या 471 धावांच्या डोंगराची उंची चांगलीच कमी झाली होती. हॅरी बुकने हाराकिरी करून त्याचं शतक गमावलं, पण फक्त 112 चेंडूंत 99 धावा फटकावल्या होत्या. इंग्लंडने आपल्या धावांचा डोंगर उभारायला सुरुवात केलेली होती.
या सामन्याने कसोटी क्रिकेट नेमपं किती अन् कसं बदललंय या प्रश्नाचंही उत्तर देऊन टाकलंय. अशोक मंकड म्हणायचे, ‘‘सर्वसाधारणपणे 180 चेंडूंत पूर्ण केलेलं शतक आदर्श शतक म्हणायला पाहिजे.’’ आता या सामन्याचं उदाहरण घ्या. जैसवालने त्याचे शतक 144 चेंडूंत पूर्ण केले, गिलने 140, तर पंतने केवळ 119 चेंडू घेतले. इंग्लंडच्या पोपने 125 चेंडूंत शतक धडकावले आणि ब्रुकने 112 चेंडूंत 99 धावा सणसणवल्या! अर्थात, कसोटी सामन्यांच्या या वेगवान रूपासाठी आयपीएलचे गुऱहाळ कामी येतेय यात शंका नाही.
इंग्लंडच्या गोलंदाजांचा ताफा परिणामकारक नाही म्हणावं तर हिंदुस्थानी माराही काही टाचण्या टोचणारा दिसला नाही. बुमराचा अपवाद. कोल्हापुरी मिरचीसारखा तो इंग्लंडच्या फलंदाजांना पोळत राहिला. त्याने तब्बल 25 षटके टाकली, पण बाकीचे फार मोठे दिवे लावताना नाही दिसले.
चहापानापर्यंत इंग्लंडने सर्व बाद 465 पर्यंत धडक मारली. थोडक्यात, सामना अन् त्यातली स्पर्धा नव्याने सुरुवात झाली आहे.
हिंदुस्थानी फलंदाजांना पुन्हा एकदा स्टोक्स, वोक्स, यंग, कार्स आणि बशीरला दमदार जवाब द्यावा लागणार आहे! हे सोपं नक्कीच नसेल. चौथ्या दिवशी बशीरचा ऑफ स्पिन आपल्याला भिरकावाच लागेल अन्यथा आता या वेगवान कसोटी क्रिकेटच्या गुऱहाळात कुठला संघ रसभरी मेजवानी जेवतो आणि कुठला संघ भरडला जातो ते लवकरच कळेल!