IPL 2025 – जिंकणार तोच वाचणार! मिशन क्वालिफायर-2 साठी मुंबई-गुजरात सज्ज

आयपीएलचा सर्वात यशस्वी संघ असलेला मुंबई आणि नवा असला तरी छावा असलेला गुजरात आपापल्या पराभवांची मालिका खंडित करण्यासाठी सज्ज झालेत. जिंकणार तोच संघ वाचणार असल्यामुळे एलिमिनिटर सामन्यात विजय मिळवत क्वालिफायर–2 मध्ये धडक मारणे हे एकच ध्येय दोघांनी डोळय़ासमोर ठेवलेय. त्यामुळे एलिमिनीटर लढतीतही षटकारांची आतषबाजी आणि लक्ष्याचा पाठलाग करताना होणारा संघर्ष पाहायला मिळणार, हे निश्चित आहे.

 परदेशी खेळाडूंचा फटका

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे आयपीएलला आठ दिवसांचा ब्रेक लागला. त्यामुळे पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडसारख्या संघांच्या खेळाडूंना मायदेशी परतावे लागले. याचा फटका प्ले ऑफ खेळणाऱया चारही संघांना बसला आहे. उद्या मुंबईला रायन रिकल्टन या सलामीवीराशिवाय उतरावे लागणार आहे. तसेच मधल्या फळीतील विल जॅक्ससुद्धा मायदेशी परतल्यामुळे मुंबईला जॉनी बेअरस्टॉची मदत घ्यावी लागणार आहे. मुंबईसाठी रिकल्टनने तीन अर्धशतके झळकावली आहेत. त्याच्या अनुपस्थितीचा मुंबईला खूप मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. तसेच गुजरातला जोस बटलरशिवाय मैदानात उतरावे लागणार आहे. बटलरने या मोसमात 538 धावा केल्या आहेत आणि त्याची उणीव गुजरातला  प्रखरतेने जाणवणार, यात शंका नाही.

दोघांमध्ये कांटे की टक्कर

आयपीएलच्या या मोसमात गुजरातने मुंबईपेक्षा एक विजय अधिक मिळवला आहे. मुंबईने पराभवानंतर सलग सहा विजय मिळवत आपला दबदबा दाखवला तर गुजरात 12 सामन्यांपर्यंत टॉपवर होता, मात्र शेवटच्या दोन्ही सामन्यांत पराभवाच्या धक्क्यामुळे त्यांना आपले अव्वल स्थान गमवावे लागले. दोन्ही संघांत गुजरातची कामगिरी सरस असली तरी शुक्रवारी होणाऱया एलिमिनीटरमध्ये कांटे की टक्कर अपेक्षित आहे.

मुंबईपेक्षा गुजरातचे पारडे जड

जसप्रीत बुमरा, ट्रेंट बोल्ट, दीपक चहर आणि मुजीबूर रहमान असे गोलंदाज असल्यामुळे मुंबईची गोलंदाजी गुजरातपेक्षा काकणभर सरस आहे. मात्र फलंदाजीत गुजरातचे पारडे खूपच जड आहे. शुभमन गिल आणि साई सुदर्शन हे दोघेही सातत्याने धावांचा आणि शतकी भागींचा पाऊस पाडत असल्यामुळे गुजरातचे पारडे जडच मानले जात आहे. बटलरच्या अनुपस्थितीत गुजरातचे आव्हान आणि फलंदाजी या दोघांच्या खेळावरच अधिक अवलंबून आहे.

हार के आगे जीत! पण कुणाची ?

मुंबई इंडियन्स आपला शेवटचा साखळी सामनाच हरलेला नाहीय तर गुजरातविरुद्ध या स्पर्धेत झालेल्या दोन्ही सामन्यांतही त्यांना फक्त पराभवाची कडवी चव चाखावी लागलीय. मुंबई अहमदाबादला 36 धावांनी तर वानखेडेवर 3 विकेटनी हरलीय. दुसरीकडे गुजरातसाठीही शेवटचे दोन्ही सामने पराभवाचेच गेले. शेवटच्या दोन्ही साखळीत हार सहन करावी लागल्यामुळे त्यांना टॉप टू स्थान गमवावे लागलेय. त्यामुळे दोन्ही संघ पराभवानंतर एलिमिनीटर सामना खेळताहेत. हार के बाद जीत असते म्हणून दोघेही विजयासाठी खेळणार आहेत. पण ही जीत कुणाची असेल याचा अंदाज कुणीही बांधू
शकत नाही.

सूर्याच्या झंझावातावर मुंबईची मदार

मुंबईसाठी सर्वात यशस्वी फलंदाजी सूर्यकुमार यादवने केली आहे. ‘ऑरेंज पॅप’च्या शर्यतीत असलेल्या सूर्याने आतापर्यंत 640 धावा केल्या असून त्याची फलंदाजीच मुंबईची तारणहार ठरली आहे. मोठी खेळी करून तो मुंबईसाठी आव्हानात्मक धावसंख्या उभारू शकतोच, पण त्याला ‘ऑरेंज पॅप’च्या शर्यतीतही अव्वल स्थान पटकावता येऊ शकते. सलामीला उतरणारा रोहित पूर्ण स्पर्धेत केवळ तीन अर्धशतकेच ठोकू शकला आहे. तरीही त्याच्या बॅटमधून मुंबईला आणखी एका झंझावाती खेळीची अपेक्षा आहे.

संभाव्य अंतिम संघ

मुंबई – रोहित शर्मा, जॉनी बेअरस्टॉ, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, चरिथ असलंका, हार्दिक पंडय़ा (कर्णधार), मिचेल सॅण्टनर, जसप्रीत बुमरा, ट्रेंट बोल्ट, दीपक चहर.

गुजरात – शुभमन गिल, साई सुदर्शन, कुसल मेंडिस, शेरफन रुदरपर्ह्ड, शाहरुख खान, राहुल तेवथिया, राशीद खान, जिराल्ड कोत्झी, साई किशोर, प्रसिध कृष्णा, मोहम्मद सिराज.