
क्वालिफायर सामन्यात ना थरार दिसला ना फायर. अत्यंत एकतर्फी झालेल्या सामन्यात बंगळुरूने पंजाबचा त्यांच्या घरच्याच मैदानावर 10 षटके आणि 8 विकेट राखून विजय मिळवत आयपीएल कारकीर्दीत चौथ्यांदा अंतिम फेरी गाठली. या विजयामुळे बंगळुरू सर्वप्रथम थेट अंतिम फेरीत पोहोचला असून ते आपल्या जेतेपदाच्या स्वप्नपूर्तीपासून अवघं एक विजय दूर आहेत.
आयपीएलच्या साखळीत नऊ-नऊ विजय मिळवून प्ले ऑफमध्ये पोहोचलेल्या पंजाब आणि बंगळुरू यांच्यातला क्वालिफायर-वन सामना रंगलाच नाही. तब्बल 11 वर्षांनंतर प्ले ऑफची पायरी चढणाऱया पंजाबच्या फलंदाजांनी घोर निराशा केली. खणखणीत सलामी देणाऱया प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंहने आज मोक्याच्या क्षणी धोका दिला. ही जोडी फुटल्यानंतर धरण फुटावं तशी पंजाबची फलंदाजी फुटली. संघात कमबॅक करणाऱया जॉश हेझलवूडने संघात जोश आणणारी कामगिरी करत जॉश इंग्लिस (4), श्रेयस अय्यर (2) यांना 4 चेंडूंत बाद केले. मग सुयश शर्माने भन्नाट फिरकी मारा करत शशांक सिंह (3) आणि मुशीर खान (0) यांचे त्रिफळे उडवत सामनाच संपवला. यानंतर पंजाबचा डाव संपण्याची औपचारिकता हेझलवूडने अझमतुल्लाह ओमरझइला बाद करून केली. हेझलवूड आणि सुयश शर्माने प्रत्येकी तीन विकेट घेत पंजाबचा डाव 14.1 षटकांत 101 धावांवर संपवला. 17 धावांत 3 विकेट टिपत पंजाबला खेळविणारा सुयश शर्मा ‘सामनावीर’ ठरला.
सुस्साट सॉल्ट
7 बाद 60 या केविलवाण्या अवस्थेनंतरच पंजाबचा पराभव झाला होता. बंगळुरूने 102 धावांचे माफक आव्हान अवघ्या 10 षटकांतच आपल्या पायदळी तुडवले. फिल सॉल्टने सुस्साट फटकेबाजी करताना 27 चेंडूंत 6 चौकार आणि 3 षटकार ठोकत नाबाद 56 धावांसह क्वालिफायर-वनचा खेळ संपवला. विराट कोहली (12) आणि मयंक अगरवालने (19) सॉल्टसह उपयुक्त भागीदाऱया करत बंगळुरूच्या मोठय़ा विजयासाठी हातभार लावला.
विराट स्वप्नपूर्तीच्या दिशेने
विराट कोहली आयपीएलमधला सर्वात यशस्वी फलंदाज आहे. गेली 18 वर्षे एकाच संघासाठी खेळणारा एकमेव खेळाडू आहे. तरीही तो एकही आयपीएल जेतेपद जिंकू न शकलेला एक दुर्दैवी खेळाडूसुद्धा आहे. आज त्याने स्वप्नपूर्तीच्या दिशेने एक पाऊल टाकले आहे. आयपीएलच्या इतिहासात बंगळुरूने आज चौथ्यांदा अंतिम फेरीत धडक मारली. विशेष म्हणजे तब्बल नऊ वर्षांनंतर ते पुन्हा एकदा पहिल्यावहिल्या जेतेपदासाठी भिडणार आहेत. 2016 साली ते अंतिम फेरीत पोहोचले आणि उपविजेते ठरले होते. गेल्या सहा वर्षांत ते पाचव्यांदा प्ले ऑफमध्ये पोहोचले, पण ते पहिल्यांदा अंतिम फेरी गाठण्यात यशस्वी ठरले आहेत. विशेष म्हणजे गेल्या चारही स्पर्धांत ते टॉप टू स्थान मिळवण्यात अपयशी ठरले होते.