
आयपीएलमध्ये उपांत्य फेरी अर्थातच बाद फेरी चांगली की प्ले ऑफ? याचे उत्तर भिन्न असू शकते. पण आयपीएलच्या इतिहासात प्ले ऑफमध्ये टॉप टू असलेले संघच जिंकतात, हा आजवरचा इतिहास आहे. केवळ 2016 साली तिसऱया क्रमांकावर असलेल्या हैदराबादने टॉप टू संघांकडून जेतेपद खेचून आणले होते. त्यानंतर गेल्या नऊ वर्षांत हा करिश्मा कुणालाही जमलेला नाही. हा एक अपवाद वगळता टॉप टू संघच आयपीएल चॅम्पियन्स ठरलेत.
याचाच यंदा आयपीएलला बंगळुरू किंवा पंजाब यापैकी एक नवा विजेता म्हणून लाभणार, पण क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, त्यामुळे यंदाही इतिहासाची पुनरावृत्ती होणार की गुजरात आणि मुंबई हे तिसऱया-चौथ्या क्रमांकावर असलेले संघ इतिहास बदलणार, हे क्वालिफायर- 2 च्या संघर्षानंतर स्पष्ट होईल.
मुंबई इतिहास बदलणार?
आयपीएलमध्ये टॉप टू संघच जिंकतात, पण पाच वेळा आयपीएल जिंकणारा मुंबईचा संघ चौथ्या क्रमांकावर राहूनही सहाव्यांदा आयपीएल जिंकण्याचे ध्येय उराशी घेऊन मैदानात उतरणार आहे. दुसरीकडे केवळ चौथ्यांदाच आयपीएल खेळत असलेल्या गुजरात टायटन्सने तिसऱयांदा प्ले ऑफ गाठलेय. गेल्या दोनपैकी एका स्पर्धेत ते विजेते तर एका स्पर्धेत उपविजेते ठरलेत. आता यावेळी त्यांनासुद्धा इतिहास बदलण्याची संधी आहे.
आयपीएलच्या नव्या विजेत्याचा राज्याभिषेक
आयपीएलमध्ये टॉप टू संघच विजेते ठरतात. त्यामुळे आजवर एकही जेतेपद न पटकावलेल्या बंगळुरू आणि पंजाब यांच्यातच अंतिम सामना होणार, असे भाकीत आहे. विराट कोहलीचा बंगळुरू संघ सलग 18 व्या या स्पर्धेत खेळतोय. त्यांनी आजवर तीनदा अंतिम फेरीही गाठलीय, पण त्यांनी एकदाही जेतेपद उंचावण्याचे भाग्य लाभलेले नाही. टॉप टूपैकी किमान एक संघ तर अंतिम फेरीत पोहोचणार, तो बंगळुरूचाच संघ असू शकतो. कारण या स्पर्धेत त्यांची देहबोली आणि खेळ विजेत्यासारखाच होत आहे. पंजाबचा संघ तब्बल 11 वर्षांनी प्ले ऑफमध्ये पोहोचलाय. 2014 ते उपविजेते ठरले होते. हा संघही गेली 18 वर्षे आयपीएलचा भाग राहिला आहे.
आयपीएल प्ले ऑफचा इतिहास
2011 आयपीएलमध्ये प्ले ऑफचा नियम 2011 सालापासून सुरू झाला. त्याआधी तीन स्पर्धांमध्ये उपांत्य आणि अंतिम सामना खेळविण्यात आला होता.
5 आयपीएलच्या इतिहासात अव्वल स्थानावर असलेला संघ पाच वेळा विजेता ठरलाय.
8 गुणतालिकेत दुसऱया स्थानावर असलेल्या संघाने चक्क आठ वेळा बाजी मारलीय.
13 प्ले ऑफ सुरू झाल्यापासून 14 पैकी 13 विजेतीपदे टॉप टू संघांनीच जिंकलीत.
1 फक्त एकदाच तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या हैदराबादने 2016 साली बाजी मारलीय.
3 प्ले ऑफ सामन्यांच्या 14 वर्षांच्या इतिहासात केवळ 3 वेळाच तिसऱया आणि चौथ्या क्रमांकाच्या संघांना अंतिम फेरी गाठता आलेली आहे. त्यापैकी एकदाच म्हणजे 2016 साली तिसऱया क्रमांकावर असलेल्या हैदराबादने विजेतेपदाला गवसणी घालण्याचा इतिहास रचला होता.
11 प्ले ऑफच्या क्वालिफायर–1 मध्ये भिडलेले टॉप टू संघ चक्क 11 वेळा अंतिम फेरीतही भिडलेत.
10 मुंबईने दहाव्यांदा प्ले ऑफ गाठण्याचा पराक्रम केलाय. चेन्नईला नऊ वेळा तर बंगळुरूला आठ वेळा ही किमया साधता आलेली आहे, पण ते एकदाही जेतेपद जिंकलेले नाहीत. तसेच गुजरात तिसऱयांदा तर पंजाब दुसऱयांदा प्ले ऑफमध्ये आपले नशीब आजमावणार आहे.