
बंगळुरू येथे गेल्या 36 तासांपासून पावसाचा अक्षरशः कहर पाहायला मिळत आहे. पावसामुळे शहरातील अनेक भाग जलमय झाले असून, जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर 500 हून अधिक घरांमध्ये पाणी शिरले आहे.
हिंदुस्थानी हवामान खात्याच्या (IMD) माहितीनुसार, बंगळुरूत गेल्या 24 तासांत 105.5 मिमी पावसाची नोंद झाली आहे, जी गेल्या तीन वर्षांतील मे महिन्यातील सर्वाधिक आहे. याआधी 18 मे 2022 रोजी 105.5 मिमी आणि 6 मे 1909 रोजी 153.9 मिमी पावसाची नोंद झाली होती. सध्या शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले असून, सिल्क बोर्ड जंक्शन, हेब्बल, येलहंका, शांतीनगर बसस्थानक, कांतीरवा स्टेडियम आणि बीटीएम लेआउटसारखा भाग जलमय झाला आहे.
पाणी साचल्यामुळे अनेक वाहने रस्त्यावर अडकली आहेत. त्यामुळे शहरातील अनेक भागात वाहतूक कोंडी झाली आहे. यातच शहरातील एका अपार्टमेंटमध्ये शिरलेले पावसाचे पाणी काढताना विजेचा धक्का बसून 12 वर्षांच्या मुलासह दोघांचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, आतापर्यंत सुमारे 150 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. तसेच मदत आणि बचावकार्या सुरू आहे.