नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये कांदा कुजला; गोण्या फेकून देण्याची व्यापाऱ्यांवर वेळ; शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान

फेब्रुवारीनंतर कमी पडलेले पाणी आणि मे महिन्यात सुरू झालेला अवकाळी पाऊस, याचा जोरदार फटका राज्यभरात उन्हाळी कांद्याला बसला आहे. पावसात भिजल्याने कांदा खराब होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून एपीएमसी मार्केटमध्ये व्यापाऱ्यांना गोण्याची गोण्या कांदा कचऱ्यात फेकावा लागत आहे. कांद्याचे दर सध्या ५ ते १५ रुपये किलोदरम्यान आहेत. दर पडलेले असतानाच कांदा खराब होण्याचे प्रमाण वाढल्याने शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.

राज्याच्या विविध भागांत महिनाभर अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. त्यावेळी बहुतेक ठिकाणी कांद्याची काढणी आणि कापणी सुरू होती. हा सर्व कांदा पावसात भिजल्याने आता खराब होऊ लागला आहे. त्यातच आता अवकाळी पावसानंतर मान्सूननेही जोर धरला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. परिणामी एपीएमसीच्या कांदा-बटाटा मार्केटमध्ये कांद्याची आवक वाढली आहे. मात्र मोठ्या प्रमाणात भिजलेला कांदा मार्केटमध्ये येत असल्याने तो खराब होत आहे. परिणामी गोण्याची गोण्या कांदा कचऱ्यात फेकावा लागत असल्याने व्यापारी आणि शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे.

मालाला उठाव नाही
उन्हाळी कांद्याची मोठ्या प्रमाणात साठवणूक केली जाते. मात्र यंदा अनेक ठिकाणी कांदा अवकाळी पावसात भिजल्यामुळे तो साठवता येणार नाही. परिणामी नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. खराब मालाचे प्रमाण वाढल्याने तो कवडीमोल दराने विकला जात आहे. सध्या मालाला उठाव नसल्याने व्यापाऱ्यांवर मालाचे राखण करण्याची वेळ ओढावली आहे. रखडपट्टी झाल्यामुळे दररोज शेकडो गोण्या कचऱ्यात फेकाव्या लागत आहेत.

दुहेरी संकटामुळे बळीराजा हतबल
गेल्या वर्षी पाऊस सुरुवातीला एकदम कोसळला. पाऊस लवकर न उघडल्यामुळे कांद्याची लागवड उशिराने झाली. त्यानंतर पावसाने दडी मारल्याने राज्याच्या अनेक भागांत फेब्रुवारी महिन्यातच पाणी कमी पडले. परिणामी एक महिना कांद्याला न मिळाल्याने कांदा परिपक्व झाला नाही. त्याचा रंग पांढराच राहिला. हाच कांदा काढणीला आणि कापणीला सुरुवात झाल्यानंतर मात्र अवकाळी पावसाने जोरदार धुमाकूळ घातला. त्यामुळे कांदा शेतातच भिजल्याने आता तो कवडीमोल दराने विकला जात आहे. खराब होण्याचे प्रमाणही वाढले आहे. या दुहेरी संकटामुळे शेतकरी हैराण झाले आहेत.

गाडीभाड्यासाठी पदरमोड
नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये कांदा पाठवण्यासाठी शेतकऱ्यांना गोणीच्या मागे सुमारे दीडशे ते दोनशे रुपये खर्च येत आहे. मात्र कांद्याचे बाजार सध्या मोठ्या प्रमाणात घसरल्यामुळे दोन आणि तीन क्रमांकाचा कांदा ५ ते सहा रुपये किलो या दराने विकला जात आहे. चिंगळी कांद्याला तर एक ते दोन रुपये किलोचा दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मार्केटमध्ये पाठवलेल्या कांद्याच्या गाडीभाड्यासाठी पदरमोड करावी लागत आहे.