
यंदाच्या शैक्षणिक वर्षाला 16 जून पासून प्रारंभ झाला. शाळेच्या पहिल्या दिवशी वाजत-गाजत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळांमध्ये शासकीय अधिकाऱ्यांनी उपस्थित रहाण्याचे आदेश शासनाने दिले होते. मात्र रत्नागिरी जिल्ह्यातील 10 अधिकारी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळेत उपस्थित नव्हते.
जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये 16 जून रोजी विद्यार्थ्यांचे वाजत-गाजत ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले होते. यावेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी शाळेत उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे स्वागत करून संवाद साधणे शासनाला अपेक्षित होते. प्रत्येक अधिकाऱ्याला एक शाळा नेमून देण्यात आली होती. जिल्ह्यातील 410 अधिकाऱ्यांनी शाळेला भेटी दिल्या. त्यामध्ये वर्ग 1 आणि 2 चे 118 अधिकारी, 44 विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख 173, इतर 75 अधिकारी आणि तीन लोकप्रतिनिधींनी शाळांना भेटी दिल्या.
या अधिकाऱ्यांनी मारली दांडी
एकूण 10 अधिकाऱ्यांनी स्वागताच्या दिवशी शाळेला भेट दिली नाही. त्यामध्ये राहूल गायकवाड – उपजिल्हा निवडणूक अधिकारी (जि.प.शाळा कुवांरबाव क्र.1), हर्षलता गेडाम – उपजिल्हाधिकारी (जि.प.शाळा रवींद्रनाथ कुवांरबाव), निशाताई कांबळे – उपजिल्हाधिकारी भूसंपादन (नगरपरिषद शाळा क्र.1 गाडीतळ), अर्चना बोंबे – तहसीलदार (जि.प.शाळा कर्दे), अमोल दाभोळकर – उपअभियंता जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा (जि.प.शाळा क्र.1 करतुडे) डॉ. महेश्वरी सातव – तालुका आरोग्य अधिकारी (जि.प.शाळा खालगाव क्र.3), आदिती अभिजीत कसालकर – पशुधन विकास अधिकारी (जि.प.शाळा पानवल), उमा घारगे पाटील – गटविकास अधिकारी (जि.प.शाळा ओझरवाडी), ज्योती यादव – तालुका आरोग्य अधिकारी (कापसाळ पायर) यांनी 16 जून रोजी शाळेत भेट दिली नाही. दोन अधिकाऱ्यांनी भेट न देण्याची कारणे दिली आहेत त्यामध्ये तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेश्वरी सातव यांनी आरोग्य तपासणी असल्याने भेट देता आली नाही, असे सांगितले आहे. तसेच तालुका आरोग्य अधिकारी ज्योती यादव यांनी कापसाळ-पायरवाडी पुलावर पाणी आल्याने शाळेला भेट देता आली नसल्याचे सांगितले आहे.