
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या सत्कार सोहळ्याआधी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला तर 33 जण जखमी झाले आहेत. या चेंगराचेंगरीमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना RCB ने प्रत्येकी दहा लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच जखमींच्या मदतीसाठी ते फंड गोळा करणार आहेत.
18 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे आयपीएल जेतेपदाचे स्वप्न पूर्ण झाले. या स्वप्नपूर्तीचा जल्लोष बंगळुरूतही झालाच पाहिजे, या भावनेने संघांची विजय यात्रा काढण्याचे ठरले होते. कर्नाटक विधानसभेपासून चिन्नास्वामी स्टेडियम हा दोन किमीचा मार्ग विजय यात्रेसाठी निश्चित करण्यात आलेला. मात्र या मार्गावर दुपारपासूनच बंगळुरू संघाच्या चाहत्यांनी अभूतपूर्व गर्दी केली होती. यावेळी चिन्नास्वामी स्टेडियमवर प्रवेश करण्यासाठी मोफत तिकिटे वाटली जात असल्याचे कळताच ती मिळवण्यासाठी हजारोंच्या संख्येने चाहते दुपारी 12 वाजताच चिन्नास्वामीवर धडकले. गर्दीचा अंदाज आणि गर्दीचे योग्य नियोजन करण्यात पोलीस आणि प्रशासन पुरते अपयशी ठरल्यामुळे चिन्नास्वामीच्या गेट नं. 3 वर चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर झालेल्या चेंगरा चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला तर 33 जण जखमी झाले.
विराट कोहलीची प्रतिक्रिया
विराट कोहली याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आरसीबीच्या संघाचे अधिकृत निवेदन शेअर केले आहे. या पोस्टसोबत त्याने एका वाक्याचे कॅप्शनही लिहिले आहे. माझ्याकडे व्यक्त होण्यासाठी शब्दच नाही, मी पूर्णपणे कोलमडून गेलो आहे, अशी प्रतिक्रिया विराटने बंगळुरुतील चेंगराचेंगरीवर दिली