रोखठोक – अमितभाई, तुम्ही बोलत रहा! मऱ्हाठा नक्की उठेल!

>> कडकनाथ मुंबैकर

‘‘शिवसेनेला गाडण्याची व उद्धव ठाकरे यांना धडा शिकविण्याची भाषा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली. आता मुंबईवर ताबा मिळवायचाच. आता नाही तर कधीच नाही, असेही ते म्हणाले. शिवसेना फोडली कशासाठी? त्या विषालाच यानिमित्ताने उकळी फुटली. भाजपमध्ये एखादा चिंतामणराव देशमुख निर्माण होणे नाही, पण शिंदे गटाने तर सुंताच करून घेतली! मात्र श्री. शहा यांनी हे असे बोलत राहावे. मऱ्हाठा नक्की उठेल!

आमच्या सार्वजनिक जीवनात सत्याच्या नावावरही एक भ्रष्टाचार चालतो. सध्या शिवसेना व ठाकरे घराण्याची अप्रतिष्ठा करण्याची शर्यत लागली आहे. उद्धव ठाकरे व शिवसेना यांच्याविरुद्ध कोणताही माल खपवायचा हा धंदा सुरू झाला आहे व त्याची एजन्सी भाजपचे पुढारी वाटत सुटले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे गणपती दर्शनासाठी मुंबईत आले व त्यांनी शिवसेना द्वेषाचे प्रदर्शन केले. ते संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले. भारतीय जनता पक्षाच्या मुंबईतील कार्यकर्त्यांसमोर त्यांनी बंद दाराआड भाषण केले. ते सार्वजनिक झाले. विषाला उकळी फुटावी असे त्यांचे वक्तव्य आहे.  मुख्य म्हणजे त्यांचे भाषण हे कृतघ्नतेचे टोक आहे. त्यांनी भाषणात सांगितले, शिवसेनेला गाडून मुंबईवर ताबा मिळविण्याची हीच संधी आहे. त्यांचे म्हणणे आहे की, ‘उद्धव ठाकरे यांनी भाजपला धोका दिला व त्याची शिक्षा त्यांना मिळायला हवी. भाजप शिंदे यांच्या गटाबरोबर आहे व राहील. उद्धव ठाकरे यांना आता संपवायलाच हवे.’ श्री. अमित शहा यांना त्यांचे राजकारण करण्याचा पूर्ण अधिकार आहे. लोकशाहीने हा अधिकार सर्वांना दिला; पण भाजप व त्यांचे नेते लोकशाही मार्गाने जात आहेत काय? हा प्रश्न आहे. लोकशाहीचे चारही स्तंभ अस्थिर करून देशाचे नियंत्रण काही मंडळींनी हातात घेतले आहे. त्यांनी एका बाजूला ‘मिशन मुंबई’ तर दुसऱ्या बाजूला ‘मिशन बारामती’चे षड्डू ठोकले आहे. महाराष्ट्राचे नेतृत्व पूर्णपणे खतम करायचे व तोतयांच्या हाती हे राज्य सोपवायचे, मुंबईचा सरळ घास गिळायचा असा हा कट शिजला आहे. अमित शहा यांनी ते स्पष्टपणे बोलून दाखवले!

हे आहे मिशन!

अमित शहा व भाजपचे ‘मिशन मुंबई’ काय आहे त्याचा भयंकर चेहरा उघडा पडला. अमित शहा व त्यांच्या लोकांनी अशा प्रकारची भाषणे पुनःपुन्हा करीत राहिली पाहिजेत. त्यातूनच जनमनाचा उद्रेक होईल. शिंदे गटाच्या खांद्यावर बंदूक ठेवून आणि राज ठाकरे यांना चुचकारून त्यांनी मुंबईवर नियंत्रण मिळविण्याचे ठरवले आहे. 2014 साली शिवसेनेने दोन जागांवरून भाजपशी असलेली युती तोडली असा ठपका शहा ठेवतात. मग 25 वर्षांची दोस्ती टिकविण्यासाठी भाजप दोन पावले (जागा) मागे का गेली नाही? बरं, पुढे शिवसेनेबरोबरच सरकार स्थापन झाले. शिवसेनेने लोकसभेत एकत्र यावे म्हणून अमित शहा ‘मातोश्री’वर आले होते व त्यांच्या समोर सत्तेचे वाटप समसमान झाल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी मीडियासमोर जाहीर केले होते. त्याच वेळी अमित शहांनी श्री. फडणवीस यांना थांबवले असते तर बरेच झाले असते. म्हणजे धोका कोणी कोणास दिला यावर आजचे साक्षीपुरावे करण्याची वेळच आली नसती.

लाचारांची मानसिकता!

आता या प्रकरणात लाचार शिंदे गटाची मानसिकता समजून घ्यायला हवी. 2014नंतर श्री. अमित शहा यांनी शिवसेना व ठाकऱ्यांवर अनेक विखारी हल्ले केले. ‘शिवसेना को पटक देंगे’ अशी भाषा वापरली, पण एकनाथ शिंदे यांनी त्या वक्तव्याचा साधा निषेधही केला नव्हता. शिवसेनेचे अनेक नेते व प्रवक्ते ‘पटक देंगे’वर तुटून पडले होते तेव्हा श्री. शिंदे यांचा स्वाभिमान, अभिमान, हिंदुत्व बर्फाच्या गोळय़ाप्रमाणे विरघळून गेले. तेव्हाही अमित शहा शिवसेना गाडायला निघाले होते व आजही त्यांचे तेच स्वप्न आहे. दोन्ही वेळेस शिंदे हे अमितभाईंचे हस्तक म्हणूनच काम करीत होते आणि स्वतःची कातडी वाचवत होते असेच दिसते. आता तर ते उघडपणे ‘पटक देंगे’ धोरणाचे पुरस्कर्ते आहेत. कारण नाहीतर भाजप त्यांना ‘ईडी’ नामक हत्तीच्या सोंडेत घालून पटक देईल! अमित शहा शिवसेनेला जमिनीत गाडण्याची भाषा करतात आणि शिंदे व त्यांचे ‘स्वाभिमानी’ लोक टाळय़ा वाजवतात. महाराष्ट्रावर मोगल चाल करून आले तेव्हा येथील काही लोक शिवरायांना साथ देण्याऐवजी मोगलांना रसद पुरवत होते. शिंदे गटाच्या रूपाने तेच आता घडत आहे, असे दिसते.

शिवसेनेचा वंश

शिंदे गटाच्या मदतीने मुंबई जिंकू, मुंबईवरील महाराष्ट्राचा आणि मराठी अस्मितेचा ठसा नष्ट करू याच मिशनसाठी अमित शहा मुंबईत आले. शिवसेनेची काही माणसे त्यांनी विकत घेतली, पण जनमत कसे विकत घेणार? शिंद्यांचे लोकही बाळासाहेबांना मानतात. जगात कोणीच अमर नाही. उद्या ‘वर’ गेल्यावर बाळासाहेबांना काय सांगणार? मुंबईचा सौदा करून भाजपच्या ‘मिशन मुंबई’ला रसद पुरवून आम्ही मोठीच मर्दानगी केलीय, असे सांगणार आहेत का? अमित शहांचे वक्तव्य संपूर्ण महाराष्ट्राने गांभीर्याने घेण्याची गरज आहे. मुंबईविरुद्ध मोठा कट असल्याने शिंदे गटावर फुले उधळली जात आहेत. हा महाराष्ट्राला धोका आहे. कधीकाळी रजनी पटेल यांनीही शिवसेनेस गाडण्याचा विडा उचललाच होता, पण त्यानंतर शिवसेना अनेक योजने पुढे गेली हा इतिहास आहे. शिवसेना संपवू अशी भाषा करणाऱ्या पटेलांची ‘तिरडी’च बांधू असे आव्हान तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी दिले. त्याच शिवसेनेचा वंश आज सर्वत्र आहे. शिंदे गट म्हणून मिरवणाऱ्यांना हे सत्त्व काय समजणार? अमित शहांच्या या महाराष्ट्रद्रोही वक्तव्यावरच शिंदे गटात बंड व्हायला हवे, पण लाचार आणि बेइमानांकडून स्वाभिमानाची अपेक्षा कशी करायची?

समान सत्तावाटपाचे काय?

श्री. अमित शहा म्हणतात, महाराष्ट्रात शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला नव्हता. हा खुलासा त्यांनी अडीच वर्षांनंतर केला, पण समान सत्तावाटपाचे ठरलेच होते. तो शब्द कोणी फिरवला? अर्थात हातात ईडी, सीबीआय व इतर संस्था आहेत म्हणून सत्य बोलणाऱ्यांच्या बाबतीत ‘पटक देंगे’ची भाषा सहज वापरली जाते. ‘शिंदे गट म्हणजेच शिवसेना’ असे बोलण्यापर्यंत मजल जाते, परंतु नियती रोज नवनवे डाव खेळत असते व राजकारणाचे चक्र हे खाली-वर होतच असते. आज पुन्हा महाराष्ट्राचे राजकारण अशा सीमेवर उभे आहे की, या राज्याच्या राजकारणामुळे देशाच्या राजकारणाला कलाटणी मिळू शकेल. शिंदे गट हा साबणाचा बुडबुडा आहे. शेवटी जेथे ठाकरे तिकडे शिवसेना हेच लोक मान्य करतील. आज सत्तापदे, मुख्यमंत्रीपद आहे म्हणून मुंगळे व माश्या गुळाभोवती आहेत. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे, दिल्लीच्या आक्रमणाविरुद्ध एकत्र येऊन लढण्याचे ‘मिशन’ राखले तर महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभेत मोठा चमत्कार होईल. नितीश कुमार व यादवांनी उत्तरेचे राजकारण यशस्वी करावे, महाराष्ट्रात ठाकरे-पवारांनी लक्ष द्यावे. ते यशस्वी झाले तर बरेच साध्य होईल. भाजपचे ‘मिशन बारामती’चे प्रयोग अनेक वर्षांपासून चाललेच आहेत. ठाकरे-पवारांचे नेतृत्व राहूच नये यासाठी ही धडपड आहे. हा कृतघ्नपणाच आहे.

महाराष्ट्राविषयीचा द्वेष

अमित शहा हे वारंवार शिवसेनेच्या बाबतीत ही अशी भाषा वापरतात. हा त्यांच्या मनातील महाराष्ट्राविषयीचा द्वेष आहे. खरं तर त्यांनी महाराष्ट्र आणि मराठी माणसांविषयी सदैव कृतज्ञ राहायला हवे. केंद्रातले ‘यूपीए’ सरकार मोदी व अमित शहांच्या मागे हात धुऊन लागले असताना मोदी व पवारांतील सुसंवादामुळेच अमित शहा यांना गोध्रा हत्याकांडातील एका प्रकरणात जामिनावर मुक्त होण्यास मदत झाली. हा गौप्यस्फोट नसून सत्य आहे. आणखी एका प्रकरणात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ‘सरकार’ पद्धतीने भूमिका करून अमित शहा यांना त्या काळात मदत होईल अशी व्यवस्था केली. या दोन्ही प्रसंगांवर स्वतंत्र लिखाण संजय राऊतच करू शकतील. शरद पवार आणि उद्धव ठाकरे बोलू शकतील; पण त्याच ठाकरे-पवारांविरुद्ध टोकाचे मिशन आज अमित शहा व त्यांचे लोक चालवीत आहेत. राजकारणात व लोकशाहीत मतभेदांना जागा आहे. निवडणुकीच्या माध्यमांतून पराभव  करणे व तसे बोलणे हे चुकीचे नाही, पण भाजपास शिवसेना फुटल्याबद्दल आनंदाचे भरते आले आहे. शिंदे गटास बेकायदेशीरपणे राजसिंहासनावर बसवून त्यांनी ईप्सित साध्य केले. त्यांचे हास्य विकट आहे. उद्धव ठाकरे व शिवसेनेस गाडण्याची भाषा महाराष्ट्रविरोधी आहे. बाळासाहेब ठाकरेंशी व त्यांच्या विचारांशी बेइमानी आहे. अमित शहा मुंबईत येऊन अशा विषाची पेरणी करतात व भाजपमधील ‘मऱहाठे’ त्यावर टाळय़ा वाजवतात. भाजपमध्ये एखादा चिंतामणराव देशमुख निर्माण होण्याची शक्यता नाही. मात्र अमित शहांनी शिवसेना गाडण्याची व ठाकऱ्यांना धडा शिकविण्याची भाषा सतत करीत राहावे.

त्यातूनच नव्या दमाचे वीर, योद्धे निर्माण होतील.

स्वतःस शिंदे गट म्हणवून घेणाऱ्यांनी तर स्वाभिमानाची सुंताच करून घेतली आहे! ते निद्रिस्त आहेत.

पण ‘मऱ्हाठा’ नक्की उठेल!

[email protected]