या सरकारच्या डोक्यामध्ये नासके बटाटे भरलेले आहेत का? संजय राऊत यांचा सरकारला सवाल

तिसऱ्या भाषेबाबत जर पहिला आदेश होता मग नवीन आदेश काढण्याची गरज काय? असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी विचारला आहे. तसेच या सरकारच्या डोक्यामध्ये नासके बटाटे भरलेले आहेत का? असेही संजय राऊत म्हणाले.

मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, या क्षणी माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांनी एकत्र येऊन मराठीसाठी आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे यातच सगळं आलं. याला बिटवीन द लाई्स म्हणतात, हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. दोन पक्षांमध्ये आणि दोन पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्तम संवाद, सुसंवाद असल्यामुळे आम्हाला भविष्याची चिंता वाटत नाही असे, संजय राऊत म्हणाले.

ही फक्त दोन ठाकरे बंधूंच्या युतीची नांदी असं मी म्हणत नाही तर महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या एकीकरणाची नांदी आहे. या महाराष्ट्रात मराठी संघटन जे बाळासाहेब ठाकरे यांनी उभं केल, जगातला मराठी माणूस शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एक केला, त्याला तडे देण्याचं काम नरेंद्र मोदी, अमित शहा, फडणवीस वगैरे लोकांनी केलं. तो मराठी माणूस माननीय उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याने मराठी माणूस एक होणार असेल तर त्याचं स्वागत मराठी माध्यमांनीही करायलाच हवं असे संजय राऊत म्हणाले.

देवेंद्र फडणवीस सरकारने घेतलेल्या शासन निर्णायाची आम्ही होळी करणार आहोत. गेल्या तीन चार वर्षांमध्ये हे झोपले होते का? या सरकारला नवीन आदेश काढला नाही. जर पहिला आदेश होता मग नवीन आदेश काढण्याची गरज काय? हे लोक मूर्ख आहेत का यांच्या डोक्यावर परिणाम झालाय का? या सरकारच्या डोक्यामध्ये नासके बटाटे भरलेले आहेत का? गेले किमान 25 वर्ष मी संसदेमध्ये आहे, आम्हाला माहिती आहे शासन कसं चालत. आमचं कसं चालतय आणि तुमचं कसं चालवताय. आमचं शासन चाललंय आणि राजकारणातलं तुमच्या गुंड टोळ्या सुरू आहेत अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.