
सुप्रीम कोर्टाच्या निकालाचं स्वागत, आमचा युद्ध सराव झालेला आहे; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर संजय राऊत यांची प्रतिक्रिया शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. आमचा युद्ध सराव झालेला आहे, असे म्हणत संजय राऊत यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सज्ज असल्याचे म्हटले आहे.
कायद्याच्या कचाट्यात या निवडणुका अडवून ठेवण्यात आल्या. सुप्रीम कोर्टाने दिलेला आदेश आहे आणि आम्ही तयार आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणं गरजेचं आहे, ही मागणी आम्ही वारंवार करत होतो. महापालिका, जिल्हा परिषदा, नगरपालिका इथे जर लोकप्रतिनिधींचं सरकार नसेल तर लोकांनी कामं कुणाकडे घेऊन जायची? विकास कसा होणार? आज मुंबईची अवस्था पाहा, ठाण्यात जाऊन पाहा की, महापालिका अस्तित्वात नसल्यामुळे या शहरांना कशी दुर्गती प्राप्त झालेली आहे. हा निकाल आलेला आहे. या निकालाचं आम्ही स्वागत करतो. चार महिन्यांत निवडणुका घ्यायच्या आहेत. आणि आमचा युद्ध सराव हा आधी झालेला आहे, असे संजय राऊत म्हणाले.
पावसाळ्यात निवडणुका घेणं सोपं नाही. पावसाळ्यात निवडणुका घेणं जरी सोपं नसलं तरी आता सुप्रीम कोर्टाचा आदेश असल्यामुळे आम्हाला सगळ्यांना त्या परिस्थितीला सामोरं जावं लागेल. आणि आमची तयारी आहे, असे संजय राऊत म्हणाले.