
केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना उदंड झाल्या आहेत. योजनांचा नुसता सुकाळ झाल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. सर्व योजनांचे फॉर्म ऑनलाइन पद्धतीने भरावयाचे आहेत. मात्र, शासनाच्या उदंड योजना या सर्व्हर नसल्याने थंड झाल्या आहेत. त्यामुळे अक्कलकोट शहर व तालुक्यातील जनतेमधून नाराजीचा सूर उमटत आहे.
सध्या जन्म, मृत्यूचे दाखले ते शासनाच्या विविध योजनांचे फॉर्म ऑनलाइन पद्धतीने भरण्यात येत आहेत. अक्कलकोट शहर व तालुक्यात सीएससी सेंटर व महा-ई-सेवा तसेच मोबाईलमधील विविध ऍपद्वारे अनेक योजनांचे अर्ज शासनाकडे पाठविण्यात येत आहेत. सर्वसामान्य नागरिकांसाठी ही चांगली सोय आहे. विविध कार्यालयांत हेलपाटे न मारता ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरल्यास अनेकांचा वेळ वाचत आहे. या अर्जांनाच मंजुरी मिळत आहे. शेतीच्या विविध योजना, शालेय शिष्यवृत्ती योजना, शालेय फी, वसतिगृह फी प्रतिपूर्ती योजना, ज्येष्ठ नागरिकांच्या योजना, पीकविमा, पोस्ट, लाडकी बहीण अशा विविध योजनांचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरावे लागत आहेत. या योजनांचा लाभ घेण्यासाठी तालुक्यातील महा-ई-सेवा तसेच सीएससी सेंटरवर गर्दी होत आहे. परंतु सर्व्हरच वारंवार डाऊन होत असल्याने माहिती भरताना व्यत्यय येत आहे. त्यामुळे अनेकांवर या योजनांपासून वंचित राहण्याची वेळ येणार आहे.
शासनाच्या अनेक योजनांचा लाभ घेण्यासाठी सर्वसामान्य नागरिक, महिला वर्ग, विद्यार्थ्यांची महा-ई -सेवा केंद्र तसेच सीएससी सेंटरवर गर्दी होत आहे. परंतु, सर्व्हर नसल्याने विलंब होत आहे. यामुळे नागरिकांना या कार्यालयांमध्ये हेलपाटे मारावे लागत आहेत. यामध्ये वेळ आणि मोठे आर्थिक नुकसान होत असल्याने मनस्तापाची वेळ येत आहे. त्यामुळे याबाबत प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करावी, जेणेकरून वारंवार सर्व्हर डाऊन होणार नाही, अशी मागणी होत आहे.
कर्मचारीही त्रस्त
जुने रेशन कार्ड रद्द करून बाराअंकी कुटुंबपत्रिका काढण्यासाठी अर्जदार कुटुंबातील सर्व माहिती भरूनही अर्ज तहसील कार्यालयांतर्गत पुरवठा निरीक्षक पुरवठा विभागाकडून मान्यता मिळत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. यातच अनेक वेळा सर्व्हर डाउनमुळे नागरिकांसह कर्मचारीही त्रस्त झाले आहेत.