
शिवसेना आणि मनसे युतीबाबत रोज बातम्या येत असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज यावर थेटच बोलले. ‘महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होणार,’ असे स्पष्ट शब्दांत सांगताना ‘संदेश देणार नाही, मी बातमीच देतो’ असे सूचक विधान उद्धव ठाकरे यांनी केले. त्यामुळे शिवसेना-मनसे यांच्यात सूर जुळणार, असे संकेत मिळाले असून अवघ्या महाराष्ट्राची उत्सुकता ताणली गेली आहे.
शिवसेना सोडून मिंधे गटात गेलेल्या सुजाता शिंगाडे आपल्या कार्यकर्त्यांसह पुन्हा स्वगृही परतल्या. ‘मातोश्री’ निवासस्थानी उद्धव ठाकरे यांनी त्यांचे शिवसेनेत स्वागत केले. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी मनसेसोबत युतीबाबत प्रथमच भाष्य केले.
चर्चा सुरू आहे का, असे पत्रकारांनी विचारताच, मी एका वाक्यात तुम्हाला सांगितलं आहे. त्याच्यातले बाकीचे जे काही बारकावे आहेत ते आम्ही बघतोय, असे उत्तर उद्धव ठाकरे यांनी दिले.
उद्धव ठाकरे-राज ठाकरे कधी एकत्र येणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. साद दिली, प्रतिसादही सकारात्मक आहे; पण शिवसेनेने अधिकृत प्रस्ताव पाठवावा मग पाहू, असे मनसे म्हणत आहे, त्यावर तुमची प्रतिक्रिया काय, असे पत्रकारांनी विचारले असता, ‘ठीक आहे बघू ना… जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे तेच होईल,’ असे उद्धव ठाकरे म्हणाले आणि टाळय़ांचा कडकडाट झाला.
शिवसैनिक–मनसैनिक संपर्कात, कुठेही संभ्रम नाही
तुम्ही कार्यकर्त्यांना काय संदेश द्याल, असा प्रश्न येताच संदेश कशाला मी बातमीच देतो तुम्हाला, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी सूर जुळत असल्याचे संकेत दिले. माझ्या शिवसैनिकांच्या मनात कुठेही संभ्रम नाही. त्यांचे सैनिक आणि माझे शिवसैनिक एकमेकांच्या संपका&त आहेत. त्यांच्याही मनात संभ्रम नाही. त्यामुळेच संदेश वगैरे देण्यापेक्षा माझं स्पष्ट म्हणणं आहे की, जी काही बातमी द्यायची आहे ती बातमी आम्ही देऊ, असे उद्धव ठाकरे यांनी पुढे सांगितले.
राज ठाकरे यांनी घेतली बैठक
महापालिका निवडणुका जवळ येत असतानाच शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहे. महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसांचीदेखील अशीच भावना आहे. या पार्श्वभूमीवर अनेक घडामोडी घडत असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज आपल्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी तातडीची बैठक घेत मनसे पदाधिकाऱयांचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी दोन्ही पक्षांमध्ये एकत्र येण्याबाबत सकारात्मक बोलणं असेल तर चांगली गोष्ट आहे, महाराष्ट्रात ठाकरे ब्रॅण्ड टिकला पाहिजे, अशी भूमिका पदाधिकाऱयांनी मांडली.
साद–प्रतिसाद
– महाराष्ट्र आणि मराठी माणसाचे हित आणि अस्तित्वापुढे आमच्यातील वाद-भांडणं क्षुल्लक व किरकोळ आहेत. आम्ही एकत्र येणं, एकत्र राहणं, ही काही कठीण गोष्ट आहे, असं मला वाटत नाही. विषय इच्छेचा आहे. लार्जर पिक्चर बघणं गरजेचं आहे. मी ते पाहतोय, अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली होती.
– त्यावर आमच्यात वाद, भांडणं नव्हतीच. जर असलीच तर ती आज संपली, असा प्रतिसाद उद्धव ठाकरे यांनी दिला होता. महाराष्ट्राच्या हितासाठी सर्व मराठी माणसांना एकत्र येण्याचे आवाहन मी करतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. महाराष्ट्र हिताच्या आड येणाऱयांच्या पंगतीला बसणार नाही, हे ठरवा, अशी सादही उद्धव ठाकरे यांनी घातली होती.