Bengaluru stampede – बंगळुरूतील चेंगराचेंगरीवर विराट कोहलीची पहिली प्रतिक्रिया, एका वाक्यात विषय संपवला

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने तब्बल 18 वर्षानंतर आयपीएलच्या विजेतेपदाला गवसणी घातली. या जेतेपदाच्या स्वप्नपूर्तीचा आनंद मंगळवारी रात्रभर बंगळुरुत सुरू होता. मात्र आरसीबीच्या या विजयोत्सवला बंगळुरुत गालबोट लागले. चिन्नास्वामी मैदानावर विजयाचा जल्लोष करण्यासाठी लाखोंची गर्दी उसळली आणि चेंगराचेंगरी होऊन 11 जणांचा मृत्यू झाला. यात 30हून अधिक लोक गंभीर जखमीही झाले आहेत. या दुर्घटनेवर विराट कोहली याने आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आरसीबीचे अधिकृत निवेदन शेअर करत विराटने अवघ्या एका वाक्यात विषय संपवला आहे.

गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये मंगळवारी झालेल्या ‘आयपीएल’च्या रोमहर्षक अंतिम सामन्यात ‘आरसीबी’ने पंजाब किंग्ज संघाचा पराभव करीत पहिल्यांदाच विजय मिळविला. या संघातील ‘रन मशीन’ विराट कोहली, कर्णधार रजत पाटीदारसह संपूर्ण संघ बुधवारी बंगळूरुत दाखल झाला. विमानतळावरच हजारो क्रिकेट रसिकांनी गर्दी केली होती. त्यानंतर ‘आरसीबी’च्या टीमचा कर्नाटक विधान भवनात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विधान भवन ते चिन्नास्वामी स्टेडियम विजयी संघाची ओपन व्हिक्टरी परेड निघणार होती. मात्र रस्त्यावर क्रिकेटप्रेमींची प्रचंड गर्दी उसळल्यामुळे पोलिसांनी परवानगी नाकारली. ऐनवेळी ही परेड रद्द केली आणि थेट स्टेडियमवर विजयी संघ पोहचला आणि सत्कार समारंभ झाला. पण त्याचवेळी गेट क्रमांक तीन जवळ भयंकर चेंगराचेंगरी झाली.

दुपारी बारापासून क्रिकेटप्रेमींनी स्टेडियमवर गर्दी करण्यास सुरुवात केली. स्टेडियमची प्रेक्षक क्षमता 35 हजार असताना 2 ते 3 लाख लोकांची गर्दी स्टेडियमच्या परिसरात झाली. गेट क्रमांक तीन जवळ रेटारेटी झाली. त्यातच गेट तुटले आणि चेंगराचेंगरी झाली. अनेकजण चिरडले गेले. प्रचंड गोंधळ उडाला. पोलिसांनाही गर्दीवर नियंत्रण मिळवता आले नाही. या चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला. तर 33 वर जखमी आहेत. यावर आता विराट कोहली याने प्रतिक्रिया दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

आरसीबीचे निवेदन

आज दुपारी संघाच्या आगमनानंतर बंगळुरूमध्ये झालेल्या सार्वजनिक कार्यक्रमावेळी झालेल्या दुर्घटनेची माहिती माध्यमातून समोर आल्यानंतर आम्हाला तीव्र दु:ख झाले. सर्वांची सुरक्षितता आणि कल्याण आमच्यासाठी महत्त्वाचे असून या दुर्घटनेमध्ये झालेल्या जीवितहानीबद्दल आम्ही शोक व्यक्त करतो. तसेच पीडितांच्या कुटुंबियांप्रती आम्ही मनापासून संवेदना व्यक्त करतो. परिस्थितीची जाणीव होताच आम्ही आमच्या कार्यक्रमामध्ये बदल केले, तसेच स्थानिक प्रशासनाच्या मार्गदर्शनाचे आणि सल्याचेही पालन करत आहोत. आम्ही आमच्या सर्व पाठिराख्यांना सुरक्षित राहण्याचे आवाहन करतो, असे आरसीबीने निवेदनात म्हटले आहे.

विजय मल्ल्याचे ट्विट

तसेच आरसीबीचे मालक विजय मल्ल्या यांनीही यावर प्रतिक्रिया देताना शोक व्यक्त केला.