
वरळी सी फेस येथे अब्दुल गफार खान रोड आणि आर. जी. थडाणी मार्ग येथे स्वर्गीय बिंदूमाधव ठाकरे चौक अशी नामकरणाची पाटी अनेक वर्षांपासून वाहतूक बेटावर बसवण्यात आली होती. मात्र, कोस्टल रोड प्रकल्पाच्या कामादरम्यान वाहतूक बेट तोडण्यात आले. त्यानंतर काम पूर्ण झाल्यानंतरसुद्धा ही पाटी लावण्यात आलेली नाही. त्यामुळे लवकरात लवकर ही पाटी लावावी, अशी मागणी युवासेनेने कोस्टल रोडचे प्रमुख अभियंता स्वामी यांच्याकडे केली आहे.
वरळी विधानसभेचे युवासेना उपविभाग अधिकारी अभिजीत पाटील यांच्याकडे चौकाचे काम पूर्ण झाल्यानंतरही पाटी बसवण्यात न आल्याच्या तक्रारी आल्या. या संदर्भात अभिजीत पाटील यांनी मुंबई महापालिका किनारी रस्ता प्रकल्पाचे प्रमुख अभियंता स्वामी यांची भेट घेतली. चौकाचे काम पूर्ण झाले असून योग्य ठिकाणी तात्काळ पाटी बसवावी, असे निवेदन दिले. यावेळी कार्यकारी अभियंता भूपेंद्र राठोड, साहाय्यक अभियंता ऋषिकेश पाटील आदी उपस्थित होते. दरम्यान, स्वर्गीय बिंदूमाधव ठाकरे यांच्या नावाची पाटी लवकरात लवकर बसवण्यात येईल, असे आश्वासन स्वामी यांनी दिले.