माझ्याकडून लिहून घ्या, नितीश कुमार पुन्हा बिहारचे मुख्यमंत्री होणार नाहीत; प्रशांत किशोर यांचं भाकीत

भारतीय जनता पक्ष आणि जनता दल (यूनायटेड) पक्ष बिहारमध्ये विधानसभा एकत्र निवडणूक लढतील. मात्र निवडणूक निकालानंतर सत्तेत राहण्यासाठी नितीश कुमार पुन्हा एकदा पलटी मारतील. ते कोणत्या पक्षाशी संधान बांधतील हे सांगता येत नाही. मात्र ते पुन्हा बिहारचे मुख्यमंत्री होणार नाहीत, असे भाकीत निवडणूक रणनीतीकार, जनसुराज पक्षाचे संस्थापक आणि एकेकाळी नितीश कुमार यांचे जवळचे सहकारी राहिलेल्या प्रशांत किशोर यांनी केले आहे.

बिहारमध्ये कुणीही मुख्यमंत्री बनू शकते. मात्र यंदा नितीश कुमार मुख्यमंत्री होणार नाही. तुम्ही माझ्याकडून लिहून घ्या, जर मी चुकीचा सिद्ध झालो तर राजकारण सोडून देईल, असेही प्रशांत किशोर म्हणाले. पश्चिम चंपारण येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी प्रशांत किशोर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही आव्हान दिले. नितीश कुमार यांना 5 वर्षासाठी मुख्यमंत्री पद देणार असल्याचे मोदी आणि शहा यांनी जाहीर करावे. जर भाजपने अशी घोषणा केली तर त्यांना बिहारमध्ये आमदार निवडून आणणेही कठीण होईल, असे प्रशांत किशोर म्हणाले. तसेच नितीश कुमार यांनी लोकप्रियता घटल्याने एनडीएकडून त्यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणऊन घोषित करण्यास भाजपही आढेवेढे घेत आहे, असेही ते म्हणाले.

विधानसभा निवडणुकीनंतर भाजप मुख्यमंत्री पद देत नाही हे पाहून नितीश कुमार कदाचित एनडीएमधून बाहेरही पडू शकतात. पण जदयूच्या जागाच एवढ्या कमी होणार आहेत की त्यांनी कोणाशीही संधान बांधले तरी त्यांना मुख्यमंत्रीपद मिळणार नाही, असा दावा प्रशांत किशोर यांनी केला.

नितीश कुमार शरीराने थकले असून मनाने निवृत्त झाले आहेत. त्यांना आपल्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची नावे विचारली तर ती देखील त्यांना सांगता येणार नाहीत. अधिकाऱ्यांच्या मदतीशिवाय ते राज्यातील जिल्ह्याची नावेही सांगू शतक नाहीत. खरे तर त्यांच्यासारखा नेता बिहारचा मुख्यमंत्री आहे हेच राज्याचे दुर्दैव आहे, असा हल्लाबोलही प्रशांत किशोर यांनी केला. एवढेच नाही तर मंत्रिमंडळाच्या शपथविधीवेळी त्यांनी मोदींचे पाय धरून बिहारचा अपमान केला, असेही ते म्हणाले.