
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिंधे गटाचे मंत्री संजय राठोड यांना आज जोरदार झटका दिला. राठोड यांच्या मृद व जलसंधारण विभागाच्या रखडलेल्या 903 योजनांची मान्यताच फडणवीस यांनी रद्द केली. भूसंपादनात अडचणी, स्थानिकांचा विरोध आणि ठेकेदारांचा असहकार यामुळे गेल्या तीन वर्षांपासून या योजना रखडल्या होत्या. त्या योजनांना गती देण्यात संजय राठोड हे अपयशी ठरले. त्यामुळे शासनाचे हजारो कोटी रुपये अडकून पडले होते. या योजनांना मुदतवाढ देण्याऐवजी फडणवीस यांनी त्यांची प्रशासकीय मान्यताच रद्द केली.
लघुपाटबंधारे योजना, कोअर पाझर बंधारे, पाझर तलाव, साठवण तलाव दुरुस्ती अशा राज्यभरातील योजनांचा यात समावेश होता. निधी मंजूर होऊनही या योजनांची अंमलबजावणी गेल्या तीन वर्षांपासून रखडली होती. संजय राठोड यांच्याकडे मृद व जलसंधारण खाते आल्यानंतरही त्यांनी त्या योजना कार्यान्वित करण्याचे कोणतेही प्रयत्न केले नाहीत. मुख्यमंत्र्यांनी विभागाचा आढावा घेतला तेव्हा ते उघड झाले. आधीच राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे आणि दुसरीकडे अशा योजना रखडल्यामुळे हजारो कोटींचा निधी अडकून पडला आहे. त्यामुळे रखडलेल्या योजना रद्द करून तो निधी मोकळा करायचा आणि नव्या योजना राबवायच्या अशा उद्देशाने मान्यता रद्द केली गेली असली तरी हा मिंधे गटाला फडणवीस यांनी दिलेला एक धक्काच आहे, असेही मानले जात आहे.