वेधक – साठोत्तरी सायकल यात्री…

>> नमिता दामले  

3 जून 2025 विश्व सायकल दिवस : अधिकाधिक लोकांनी उत्साहाने सायकल या प्रदूषणमुक्त वाहनाचा वापर करावा यासाठी या दिवशी सायकल स्पर्धा, मेळावे, संमेलने यांचे आयोजन करून प्रोत्साहन दिले जाते. प्रोत्साहन अशा कार्यक्रमांमधून मिळते तसेच काही व्यक्तींच्या प्रेरक वाटचालीतूनही मिळते. सतीश जाधव यांच्या उत्साही, गतिशील, आपल्या मनश्चक्षूंच्याही आवाक्यात न येणाऱ्या अचाट आणि अफाट अशा सायकल प्रवासाचा मागोवा घेण्यासाठी हा लेखन प्रपंच.

तसं बघायला गेलं तर तुमच्या-आमच्या सारखा एक सर्वसामान्य नोकरदार असा हा माणूस. अधून-मधून ट्रेकला जावं, गाणी म्हणावी, आपलं कुटुंब, मित्र परिवार सांभाळावा असा यांचा स्वभाव. आमची ओळख एव्हरेस्ट बेस कॅम्पचा कार्यक्रम आम्ही ठरवत होतो तेव्हा झालेली. त्यावेळी ठरवा-ठरवी करायला आम्ही सगळे केईएमला भेटायचो तेव्हा हे सांगायचे की, मी आज सायकलवरून आलो. ईबीसी म्हणजे अठरा हजार फूट उंचीवरची चढाई; आम्हा सगळय़ांनाच क्षमता वाढविण्यासाठी सराव करण्याची गरज होती. कळतंय पण वळत नाही अशी आमची कथा आणि त्यात सांगायला नोकरीची सबब होतीच, पण सतीश सर मात्र सांगायचे मी आज सकाळी दहा किमी सायकल चालवली वगैरे. मी म्हणायची फुस्स… एवढय़ाशाने काय होणार (अर्थात हे सगळं मनातल्या मनात. कारण तेव्हा आमची काही विशेष ओळख नव्हती) मग ईबीसीला आम्ही आठ जण गेलो. मागे-पुढे चालताना गप्पा होत. तेव्हा मी त्यांना सहज विचारलं, `तुमच्याकडे कोणती सायकल आहे?’ `माझ्या नातवाची सायकल आहे तीच मी चालवतो.’ `तुम्ही ठाण्याला समर्पयामीला या; तिथे तुमच्यासाठी योग्य अशी सायकल मिळेल आणि ती कशी निवडावी हेही आमचा मित्र मयुरेश तुम्हाला सांगेल’ हा मी मागितलेला नसतानाही दिलेला फुकटचा सल्ला.

`आला मंतर कोला मंतर छू’ म्हटल्यावर जशी होते तशी जादू झाली. सतीश सरांनी मनावर घेतलं ते लालबागहून ठाण्याला आले. समर्पयामीमध्ये सायकल घेतली आणि कधीही न थांबता त्यांची सायकल सतत धावू लागली. त्यावेळी त्यांचा साठावा वाढदिवस होता. निवृत्तीनंतर माणसं आराम करतात, म्हणजे सर्वसाधारण मानसिकताच तशी असते. पण या माणसाने अक्षरश: कात टाकली.

सिमला ते मनाली (लाहौल, स्पिती व्हॅली) या सायकल मोहिमेत `एक बुटा बेटीके नाम’ ही संकल्पना घेऊन प्रवास करत गावागावांतून रोपं वाटत `जसं मुलीला वाढवता तसा या रोपटय़ाचा सांभाळ करा’ हा संदेश दिला. नंतर आदि कैलासाचा आदेश आला. कैलास मानस सरोवर ट्रेकिंग रस्त्यावरून धारचुला ते आदि कैलास आणि ॐ पर्वत येथे एकटय़ाने, स्वबळावर आणि वयाच्या पासष्टाव्या वर्षी सायकलिंग करून त्यांनी जागतिक विक्रम केला; त्याची नोंद लिमका बुकमध्ये केली गेली.

मग नर्मदा मैय्यानी बोलावणं पाठवलं. 3600 किमीची नर्मदा परिक्रमा सायकलनी 42 दिवसांत पूर्ण करत नर्मदा स्वच्छता अभियान राबविले. नर्मदेमध्ये स्नान करणारे भाविक नर्मदा नदीतच कपडे विसर्जन करतात. त्यांच्या प्रबोधनासाठी पथ प्रदर्शनं केली आणि भाविकांना कचरा कुंभात कपडे विसर्जन करायला उद्युक्त केले. नर्मदा परिक्रमेदरम्यान आलेला एक हृदयस्पर्शी अनुभव ते सांगतात… उम्रट या गावात शेतमजूर असलेल्या गरसिया भगत यांनी स्वत अर्धपोटी राहून मला जेवायला घातलं; त्यावेळी मला माझ्या खुजेपणाची जाणीव झाली आणि एका गरीब माणसाची दानत आभाळाएवढी विशाल असू शकते याचा प्रत्यय आला.

नागपूर ते अयोध्या 920 किमी, मुंबई ते दिल्ली 1470 किमी, हिमालयातील मुंशियारी आणि पंचचुली ग्लेशियर (14500 फूट) सहा वरिष्ठ, काही तरुणांना बरोबर घेऊन, मनाली-लेह-खारदुंगला, मुंबई कन्याकुमारी हे 1760 किमी अंतर दोन वेळा (प्रदूषणमुक्त भारत ही संकल्पना घेऊन), दोन महिन्यांत ईशान्य भारतात एकूण 3200 किमी प्रवास (सैन्यासाठी सद्भावना ही संकल्पना घेऊन) अशा अनेक सायकल मोहिमा त्यांनी यशस्वीपणे पूर्ण केल्या.

नामदेव महाराज भागवत धर्माचा प्रचार करण्यासाठी महाराष्ट्रातून पंजाबमध्ये गेले होते; त्या मार्गावर नामदेव महाराजांची पालखी घेऊन 2500 किमीची पंढरपूर ते पंजाब सायकल वारीही त्यांनी केली. देशाच्या सैनिकांना शुभेच्छा देण्यासाठी लडाखमधील उमलिंगला पास, (जगातील सर्वोच्च रस्ता, 19024 फूट) ही सायकल मोहीम मदतीसाठी वाहन न घेता त्यांनी पूर्ण केली. याबद्दल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

प्लास्टिकमुक्त लडाख आणि ` ‘Don’t litter, Save Water and Preserve Ladakh Better’ ही संकल्पना घेऊन लेह ते जम्मूपर्यंतचे अंतर सायकलनी 40 दिवसांत पार केले. त्यावेळी रॅमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित लडाखमधील एक नामवंत अभियंता, शिक्षणतज्ञ, पर्यावरण कार्यकर्ते आणि समाज सुधारक सोनम वांगचुक यांनी सरांना भेटीसाठी बोलावले. त्यांनी सांगितले की लोक मला भेटायला कोलकात्याहून कार घेऊन येतात, बंगळुरूवरून बाईक घेऊन येतात तरी मी त्यांना भेटत नाही. पण मला स्वतःहून तुम्हाला भेटावसं वाटलं. कारण तुम्ही या वयात सायकलनी मुंबईहून इथे येऊन प्रदूषणमुक्तीचा संदेश देत आहात हे खरंच प्रेरणादायी आहे.

डिसेंबर 2024 मध्ये दोन दिव्य चक्षू तरुण अजय ललवाणी आणि सागर बोडके यांना घेऊन टँडम सायकलवरून कश्मीर ते कन्याकुमारी अंतर 12 दिवसांत पार करून दुसरा जागतिक विक्रम केला. तर जानेवारी-फेब्रुवारी 2025 मध्ये 4198 किमीची कश्मीर ते कन्याकुमारी ही मोहीम सागरी महामार्गाने करून त्यांनी वयाच्या 67 व्या वर्षी या मार्गाने सेल्फ सपोर्ट सायकलिंग करणारा पहिला व्यक्ती हा नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे.

या अवलियाचं नाव आहे सतीश विष्णू जाधव; त्यांनी आतापर्यंत 78000 किमी सायकलिंग केले आहे. त्यांच्या आगामी कार्यक्रमांमध्ये केदारनाथ, आग्रा ते राजगड या सायकल मोहिमा आहेत. प्रदूषणमुक्त भारत आणि प्लॅस्टिक प्रदूषणाचे नियोजन ही संकल्पना शाळा, कॉलेजमधील मुलांमध्ये आणि जनमानसांत रुजविणे हा त्यांचा संकल्प आहे. त्यांना त्यांच्या संकल्पपूर्तीसाठी खूप-खूप शुभेच्छा!

[email protected]