
पाण्याचा अंदाज न आल्याने पर्यटक वाहून गेल्याच्या किंवा बुडून मृत्यू झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. या दुर्घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी तालुक्यातील धरण क्षेत्र व धबधब्यांसारख्या पर्यटनस्थळांवर पर्यटकांना प्रवेश बंदी केली आहे. त्यामुळे पावसाळी सहलीसाठी येणाऱ्या नागरिकांचा हिरमोड झाला आहे.
पनवेल तालुक्यात गाढेश्वर, देहरंग, मोरबे धरण असून वारदोली, कुंडी, आदई, नेवाळी असे धबधबे आहेत. तसेच तालुक्यातील हरिग्राम, धोदाणी, चिंध्रन, महोदर, शांतीवन, गाढी अशी नदीपात्र आहेत. ही सर्व पर्यटनस्थळे पावसाळ्यात पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात. पावसाचा आनंद लुटण्यासाठी हजारो पर्यटक या पर्यटनस्थळांवर गर्दी करतात. मात्र अशा ठिकाणी काही हुल्लडबाज आणि दारुडेदेखील मौजमजा करण्यासाठी येतात. दरम्यान धरण, धबधबे किंवा नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने अनेक जणांना आपला जीव गमवावा लागतो. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी या पावसाळी पर्यटनस्थळावर बंदी घालण्यात आली आहे. विशेष शाखेच्या पोलीस उपायुक्त रश्मी नांदेडकर यांच्या आदेशान्वये ही बंदी लागू करण्यात आली आहे.
“पावसाळी सहलीचा आनंद लुटण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांनी पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे. प्रतिबंधित क्षेत्रात अनेक दुर्घटना होत असल्याने त्या ठिकाणी जाणे टाळावे. तसेच पोलिसांनी उभारलेल्या फरकांवरील सूचनांचे पालन करावे अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल.”
गजानन घाडगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक