मुंबैनगरी – ऋतुचक्र बदलत आहे

>> सुधीर शालिनी ब्रह्मे

वि. द. घाटे यांचा कॅशिया मुंबईत जेथे कुठे असेल तेथे भरारत राहील, दुर्गा भागवतांचा गुलमोहोर असेल तेथे खुलेल, पण तो ज्येष्ठातच असे नाही, चैत्रातच तो हिरव्या कळ्यांनी लगडेल याची शाश्वती कमी होत आहे. ऋतुचक्र बदलत आहे.

दोनशे वर्षांपूर्वी 1822 साली आणि त्यानंतर 34 वर्षांनंतर पुन्हा 1856 साली त्यावेळच्या बॉम्बे बेटवासीयांनी दुष्काळ अनुभवला होता. बाळकृष्ण बापू आचार्य आणि मोरो विनायक शिंगणे यांनी ‘मुंबई वृतांता’त 1889 साली लिहून ठेवले आहे. या दुष्काळाची आज मुंबईकरांना कल्पनाच येणार नाही. कदाचित हे त्यांना काल्पनिक वाटेल, कारण 2005 सालची ढगफुटी! त्यानंतर देशभर पावसाळ्यात ढग फुटू लागलेत. राज्यांवर आणि शहरांवर अवकाळी अवकळा आणू लागलेत. नवे सहस्त्रक ऋतुचक्र बदलाची ढोबळमानाने नांदी ठरू पाहत आहे.

ऋतुचक्र बदलाचे गंभीर धोके मुंबईकरांनी किती मनावर घेतलेत हे जाणणे कठीण! पावसाळ्यातली मुसळधार मुंबई आणि ठिकठिकाणची तुंबई आता अंगवळणी पडली आहे. रुळांवरून पाणी वाहू लागल्याने रेल्वेगाडय़ांचं जहाजात झालेलं रूपांतर, कंबरेपर्यंतच्या पाण्यातून वाट काढताना कुंभमेळ्याचं पुण्य लाभल्याचा मुंबईकरांनी घेतलेला साक्षात्कार आणि घरातल्या टाइल्सना झरे फुटून ‘हाऊसबोट’चा उपनगरवासीयांनी घेतलेला अनुभव याचं आता अप्रूप राहिलेलं नाही. तमाम मुंबईकर चाकरमानी दरवर्षी आतुरतेने वाट पाहत असतात हक्काच्या, निसर्गदत्त पावसाळी सुट्टीची.

मुंबई अशी अनेकदा पाण्याखाली गेलीय. काल काय झालं त्याचा मागमूस न ठेवता मुंबईची जीवनवाहिनी पुन्हा काल काही झालेच नाही अशा निर्ढावलेल्या आविर्भावात दुसऱ्या दिवशी पुन्हा तुडुंब वाहू लागते. पावसाला मुंबईकरांनी असे अंगी बाणवून घेतले आहे, अगदी सलग 8-10 दिवस सूर्याला झाकणारे ढग नुसतेच डोक्यावर नव्हे तर डोक्यात जात असले तरी.

ऋतुचक्राचे बदल आपल्या डोळ्यांना सहज जाणवत नाही. पंचांग आणि दिनदर्शिकेत अधिक मास येत असतात आणि ते आपण पाहतो ‘उणे’मास पहिल्यांदाच अख्ख्या महाराष्ट्राने अनुभवला. पावसाळा उन्हाळ्यातच सुरू झाल्याने यंदा मे महिना जणू नव्हताच. हा ऋतुचक्राचा ढोबळ बदल यंदा जाणवला.

वृक्ष-वेली-पक्षी यांना मात्र या बदलांची चाहूल माणसांआधी लागते. बहावा, गुलमोहर, नीलमोहर हे वृक्ष साधारणतः मे महिन्यातच फुलतात. यंदा हे वृक्ष बहरले नाहीत. नवी मुंबईतील बेलापूरमधील पारसिक हीलच्या पायथ्याशी बहाव्याची झाडे रांगेने उभी आहेत. तो सर्व परिसर मे महिन्यात पिवळा धम्मक होतो. यंदा या झाडांना हळद लागली नाही. गुलमोहरांनाही लाल-तांबडय़ा ज्वालांनी लपेटले नाही. बेलापूर ते ओवेपर्यंत नवी मुंबईत पसरलेल्या पारसिक पर्वतराजीला लागून असलेल्या खाडी परिसरात मार्च ते मे दम्यान लाखो रोहित (फ्लेमिंगो) पक्षी येत असतात. यंदा त्यांच्या आगमनाची बातमी फुटली नाही.

नागर संस्कृती अभियांत्रिकी रहाट आणि विज्ञानाची वाट यातच गुरफटलेली असते. या संस्कृतीची श्रद्धा असते नगररचनेच्या नियोजनावरच. रचना आणि नियोजनाचा पाया उभारलेला असतो अर्थकारणावर, समाजकारणावर किंवा नागरिकांच्या परोपकारावर नव्हे, तर रचनाकार, नियोजनकार आणि गुंतवणूकदार यांच्या परस्पर परोपकारावर, सामंजस्यावर. पाया ठिसूळ असला तर गळती लागते किंवा मनोरे कोसळू लागतात. परस्पर समन्वय आणि समतोल साधताना पर्यावरण भानही आवश्यक असते. अभियांत्रिकीच्या यंत्र-तंत्रामध्ये निसर्गावर मात करण्याचा उद्दामपणा असता कामा नये.

नवी मुंबईच्या पर्जन्यजलप्रपात निचरा व्यवस्थापनाचा (स्टॉर्म वॉटर मॅनेजमेंट) शोध लागला, तो भरतीच्या पाण्यात अडकल्याने राहुटीत रात्र काढलेल्या सिडकोचे अभियंता प्रभाकर देशपांडे यांच्यावरल्या आपत्तीतून. खऱ्या अर्थाने ती इष्टापत्ती ठरली. तंत्रज्ञानाच्या पाईकांनी निसर्गाला दिलेला आदरही आहे. शतकांपूर्वी मीठ पिकविणाऱ्या कोळी बांधवांनी योजिलेल्या पारंपरिक अभियांत्रिकी उपायाच्या अनुकरणातून आजची नवी मुंबई पावसाळ्यातही सुरक्षित झाली आहे.

हजारो वर्षांपासून वापरात असलेली ही व्यवस्था म्हणजे भरतीच्या पाण्याला प्रतिबंधित करणारा चिकणमातीत बसवलेला लाकडी दरवाजा असलेला हा मातीचा बंधारा. यालाचा ‘उघडी’ म्हणतात. खाडीलगतच्या दलदलीच्या भागात असे दरवाजे आजही पाहायला मिळतात. बांधाची रचना उथळ आणि माती घालूनच केलेली असते. लाकडाची झाप लावून ती जोडलेली असते. भरतीच्या पाण्याचा शिरकाव रोखण्यासाठी हे झाप बंद केले जातात आणि ओहोटीच्या वेळी भूक्षेत्रात जमा झालेल्या पाण्याच्या निचऱ्यासाठी हे झाप उघडले जातात. भरतीच्या पाण्याच्या शिरकावाला ‘उघडी’ बंद करून अटकाव केला जातो आणि विसर्गासाठी ‘उघडी’नेच मार्ग मोकळा केला जातो.

‘नवी मुंबई नियोजनकार आणि अभियंते यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली आणि स्थानिक लोकांकडून माहिती गोळा केली. पूर्ण समाधान होईपर्यंत या पारंपरिक पद्धतीच्या चाचण्या करून पाहिल्या. यातूनच धारण तलाव (`Holding Pond`) आणि जलावरोधी तलाव (`Detention Pond`) यांचा तोडगा निघाला. अशा तऱ्हेने या नैसर्गिक समस्येवर तोडगा निघाला. देशपांडे यांची आपत्ती इष्टापत्ती ठरली.

एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात मुंबईत 80 ते 90 लहान-मोठी सार्वजनिक तळी (टाके) होती. नाखोदा महंमद रोगे, कावसजी पटेल, नबाब, बाबुल्या अशा काही धनवंतांनी लोकसेवेसाठी ही तळी बांधली होती. ही तळी आता बुजवली गेली आहेत. ही तळी आजही असती तर त्यांचाही धारण, तलाव किंवा जलावरोधी तलाव म्हणून वापर करता आला असता. अशा तलावांचे पुनरुज्जीवन करणे किंवा नवीन तलाव निर्माण करणे हा तुंबणाऱ्या मुंबईवरला उपाय ठरू शकेल. खाडीनजीकचा भाग असल्याने येथे साधारण 50 फूट खोलीवर पाणी लागते, म्हणून भुयारी मार्ग तयार करणे म्हणजे निसर्गाला आव्हान देणे आहे. मुंबईवरच नव्हे तर खालीही तुंबणे हे अपरिहार्यच आहे. भविष्यात भुयारी रेल्वेचा काही भाग बंद करून तुंबणारे पाणी वाहून नेण्यासाठी त्याचा वापर करावा लागेल.

[email protected]

(लेखक वरिष्ठ पत्रकार आणि नगर नियोजनाचे अभ्यासक आहेत.)