
राज्य सरकारने पावसाळी मासेमारी बंदी जाहीर केल्यानंतर हजारो बोटींनी बंदरात नांगर टाकला आहे. त्यामुळे मासळीची आवक घटली असल्याने भाव गगनाला भिडले आहेत. एक हजार रुपये किलोने मिळणारा जिताडा आता थेट एक हजार 400 रुपयांवर गेला आहे.
पापलेट एक हजार 300 तर सुरमई एक हजार 200 रुपयांत किलोभर मिळत आहे. मासळीच्या दरात भरमसाठ वाढ झाल्याने खवय्यांचे वांदे झाले आहेत. १ जूनपासून सुरू झालेली ही मासेमारी बंदी येत्या ३१ जुलैपर्यंत असणार आहे. त्यामुळे खवय्यांना दोन महिने चढ्या दराने मासळी खरेदी करावी लागणार आहे.
महाराष्ट्र सरकारने 60 दिवसांची पावसाळी मासेमारी बंदी जाहीर केल्यानंतर करंजा, मोरा, रेवस, मुळेखंड आदी विविध बंदरात हजारो बोटी नांगरून ठेवण्यात आल्या आहेत. गेल्या पाच दिवसांत त्याचा मोठा परिणाम मासळीच्या बाजारावर झाला आहे. आवक कमी झाल्याने मासळीचे भाव गगनाला भिडले आहेत. मासळीच्या तुटवड्यामुळे आणि भाव कडाडल्याने मात्र मासळी खवय्यांच्या खिशाला चाट बसली आहे. एक किलो कोळंबी आणि बांगडा खरेदी करण्यासाठी ग्राहकांना अनुक्रमे ६०० आणि २५० रुपये मोजावे लागत आहेत. शासनाने जारी केलेल्या मासेमारी बंदीमुळे मच्छीमारांना समुद्रात १२ नॉटिकल सागरी मैलाच्या आतील खोल समुद्रातील मासेमारी करता येत नाही. समुद्राच्या याच भागात मोठ्या प्रमाणात मासेमारी होते. मात्र बंदीमुळे ही मासेमारी आता पूर्णपणे ठप्प झाली आहे.
अन्य राज्यांत बंदी नाही
केंद्र सरकारची पश्चिम तटीय क्षेत्रातील कर्नाटक, आंध्र प्रदेश, आसाम, पश्चिम बंगाल, कन्याकुमारी, केरळ आदी राज्यांना मासेमारी बंदी लागू नसते. त्यामुळे या राज्यात मासळी बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होते. मात्र त्याचे दरही मासळी खवय्यांना परवडणारे नसल्याची माहिती करंजा मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष प्रदीप नाखवा यांनी दिली.