मुंबई महापालिकेची कठोर कारवाई, नाल्यात औद्योगिक कचरा टाकणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

मुंबईत पावसाळ्यात पाणी तुंबू नये, यासाठी मुंबई महापालिकेकडून नालेसफाई केली जाते. मात्र, नालेसफाई केल्यानंतरही, गाळ काढल्यानंतरही नाल्यात औद्योगिक तसेच सर्व प्रकारचा सरसकट कचरा टाकला जात आहे. याची गंभीर दखल घेत धारावीत नाल्यात औद्योगिक कचरा टाकणाऱ्याविरोधात मुंबई महापालिकेने गुन्हा दाखल केला आहे. शाहूनगर पोलीस ठाण्याकडून आरोपीचा शोध सुरू आहे. दरम्यान, गाळ काढलेल्या नाल्यांमध्ये रहिवाशांनी कचरा टाकू नये, असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.

मुंबईतील अनेक भागातील नाले नियमितपणे स्वच्छ केल्यानंतरही त्यात पुन्हा कचरा टाकण्याचे प्रकार घडत आहेत. या प्रकारामुळे नाले तुंबण्याचा धोका निर्माण होत असून, परिणामी शहरात पाणी साचण्याची समस्या वाढत आहे. मुंबई महापालिकेने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर, नाल्यांमध्ये औद्योगिक कचरा टाकणा-यांविरुद्ध कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. धारावी येथील टी जंक्शनकडे जाणाऱ्या नाल्याची महानगरपालिकेने नुकतीच स्वच्छता केली आहे. गाळ काढण्याबरोबरच तरंगत्या वस्तुदेखील काढण्यात आल्या. मात्र, सोमवारी जी-उत्तर विभागातील घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता अज्ञातांनी या नाल्यात थर्माकॉल, रबर, रॅपर्स, पार्सल बॉक्स इत्यादी औद्योगिक तसेच इतर वस्तू टाकल्याचे आढळले. त्याची गंभीर दखल घेत आणि वरिष्ठांच्या सूचनेनुसार, शाहूनगर पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात भारतीय न्याय संहिता 2023 कलम 326 (क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून संबंधित व्यक्ती, आस्थापनाचा शोध घेतला जात आहे.