हिंदीची सक्ती राबवू देणार नाही, या भाषिक आणीबाणीला आमचा विरोध; उद्धव ठाकरे कडाडले

हिंदी सक्तीतून मराठी आणि इतर भाषिकांच्या एकजिनसीपणात विषाचा खडा टाकण्याच प्रयत्न होत आहे असे विधान  (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तसेच  हिंदीची सक्ती राबवू देणार नाही, या भाषिक आणीबाणीला आमचा विरोध अशी रोखठोक भूमिकाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी मांडली

मातोश्री येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले की, आजची पत्रकार परिषद कोणत्याही राजकीय विषयासाठी नाही. तर आपल्याच घरात मातृभाषेच्या लढ्यासाठी आहे. माझ्यासोबत दीपक पवार सारखे सहकारी पाहिल्यावर लक्षात आलं असेल की कारण नसताना हिंदीची सक्ती महाराष्ट्रद्रोही सरकारकडून केली जात आहे. त्याला विरोध करण्यासाठी सर्व मराठी माणसं पक्षीय भेदाभेद विसरून एकत्र यावीत म्हणून मराठी प्रेमी लोक एकत्र आले आहेत आणि आवाहन करत आहेत. सहाजिकच आहे, शिवसेनेचा जन्म भुमीपुत्र मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायाविरोधात लढण्यासाठी झाला. आत सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की यांना शिवसेना का संपवायची आहे. कारण यांना महाराष्ट्रावर हुकुमाशही लादायची आहे. आमचा कोणत्याही भाषेला विरोध नाही कोणत्याही भाषेचा आम्ही द्वेष करत नाही. पण याचा अर्थ कुठलीही भाषा आमच्यावर आम्ही लादू देणार नाही. मराठी अभ्यास केंद्राचे दीपक पवार यांनी आंदोलन पुकारले आहे त्याला शिवसेना सहभागी होणारच आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले.

ही आंदोलनाची फक्त सुरुवात असेल. कारण फक्त दोन आंदोलन करून हे आंदोलन थांबणार नाही. जोवर हिंदी भाषेची ही सक्ती मागे घेतली जाणार नाही तोवर हे आंदोलन मागे घेतले जाणार नाही. तसे पाहिल्यास हा विषय पाच मिनिटांत संपण्यासारखा आहे. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले की माझ्या राज्यात हिंदीची सक्ती चालणार नाही त्यासाठी सादरीकरण करण्याची गरज नाही. आणि हे दळण कशासाठी दळताय? म्हणजे तुम्ही भाजपने जी घोषणा केली होती की बटेंगे तो कटेंगे आता बाटेंगे तो काटेंगे असं त्यांचं धोरण दिसतंय. मुंबई आणि राज्यात मराठी आणि इतर भाषिकांमध्ये जो एकजिनसीपणा आहे त्याच्यात मिठाचे नव्हे तर विषाचा खडा टाकत आहेत. हे माझे स्पष्ट आरोप नसून माझे स्पष्ट मत आहे. कारण हिंदी भाषेला आमचा विरोध नाही तर हिंदी सक्तीला आमचा विरोध आहे. कारण हिंदी चित्रपटसृष्टी मुंबईत जन्मली, या सृष्टीचे पालनपोषण मुंबईने केले. अनेक कलाकार इथे आले आणि मोठे झाले. महाराष्ट्रातही हिंदी चित्रपट मोठ्या प्रमाणावर चालतात, लोकप्रिय होता. एकूणच आम्हाला हिंदीचे वावडे नाहिये. म्हणजे त्यांचा एजेंडा आहे की कालांतराने एकच पक्ष राहिल, त्यांची एकाधिकारशाहीकडे त्यांची वाटचाल सुरू आहे. कालच त्यांनी आणीबाणीला झालेल्या 50 वर्षांचा उल्लेख केला. ही भाषिक आणीबाणी ते राबवत आहेत. या भाषिक आणीबाणीचा आम्ही विरोध करत आहोतच पण विशेष म्हणजे शिवसेनेतले गद्दार ते मिंधे म्हणून तिथे राहत आहेत त्यांनासुद्धा बाळासाहेबांचे विचार काय आहेत हे मराठीतून सांगण्याची वेळ आलेली आहे. आम्ही कोणतीही सक्ती स्विकारणार नाही, कुठलीही जबरदस्ती आम्ही लादून घेणार नाही. हिंदी कुणाला येत नाही अशातला भाग नाहिये, हिंदी सगळ्यांना येत असते. संघाचे तर भैयाजी जोशी मुक्ताफळं उधळून गेले की घाटकोपरची भाषा गुजराती आहे. मग तुम्ही त्या त्या भागांत त्या भाषांची सक्ती करणार हे चुकीचं आहे. आपला देश हा संघराज्या पद्धतीचा आहे. आपल्या देशाची वाटणी ही भाषावार प्रांतरचनेतून झाली आहे. प्रत्येक भाषेनुसार तिचा तिचा प्रांत मिळाला आहे. त्या त्या प्रांता राजधानी, मुख्यमंत्री हे सगळे मिळालेले आहे. मी मुख्यमंत्री असताना मला नाईलाजाने मराठी भाषेची सक्ती करावी लागली होती. कारण मराठीवरही ते अतिक्रमण करायला लागले होते. मी मुख्यमंत्री असताना मराठी भाषेची सक्ती केली होती म्हणजे दुकानाच्या पाट्या मराठी असल्या पाहिजेत. मराठी भाषा ही व्यवहारात आली पाहिजे. हे लोक कोण होते कुणाचे पाठीराखे होते हे आता उघड झाले आहे. मराठी भाषेची जी सक्ती आम्ही केली होती त्याचे या सरकारने काय केलं होतं  हे मला कुठेतरी वाचनात दिसलं नाही. मराठी रंगभुमीचा इतिहास सांगणारे दालन मी चौपाटीला साकारणार होतो. पण तेही मराठीद्रोही आणि महाराष्ट्रद्वेष्ट्या सरकारने हाणून पाडलं. तीसुद्धा जागा बिल्डरांच्या घशात जात आहेत. माझ्या हस्ते मराठी भाषा भवनाचे भूमीपूजन झाले होते. अजित दादा माझ्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री होते ते आता गप्प का आहेत? मला नाही वाटत त्या मराठी भाषा भवनाची एकही वीट रचली गेली असेल. आता ती जागा आहे की ती सुद्धा बिल्डरांना दिली हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे. असे अनेक विषय आहे. तुर्त हिंदी भाषेची सक्ती आमच्या लहान मुलांवर लादू देणार नाही म्हणजे नाही. कुणालाही हिंदी येत नाही म्हणून काही अडत नाही. दीपक पवार यांच्या आंदोलनाला आमचा सक्रिय  पाठिंबा आहे, शिवसेना तुमच्यासोबत आहेच, मी तमाम मराठी माणसांना पक्षीय भेदाभेद विसरून या लढ्यात सामील होण्याचे आवाहन करत आहे. यात चित्रपटसृष्टीतले मराठी कलाकारांनी उतरावे. खेळाडू, साहित्यिक सगळ्यांनी या आंदोलनात उतरले पाहिजे. ज्यांच्या हृदयात मराठी आहे, ज्यांची मातृभाषा मराठी आहे त्यांनी पक्षभेद विसरून भाजपमधलेसुद्धा अस्सल मराठी माणसं. कारण आता भाजपमध्येही आता अस्सल लोकं शोधणं हा एक संशोधनाचा विषय झालेला आहे. भाजपच्या अस्सल कार्यकर्त्यांना काही तरी वेगळा शब्द वापरावा लागेल कारण सगळे उपरे त्यांच्या डोक्यावर बसलेले आहेत. त्यामुळे भाजपमधले राहिलेले अस्सल मराठी प्रेमींनी सामील व्हावं म्हणून मी मराठीप्रेमी म्हणून विनंती करतोय. आणि पुन्हा एकदा सांगतोय कुणी कितीही प्रयत्न केले तरी हिंदी भाषेची सक्ती आम्ही महाराष्ट्रावर लादू देणार नाही. मी शिक्षण अधिकाऱ्यांना आझाद मैदानावर भेटेन जिथे आमचे आंदोलन सुरू आहे. 1960 साली त्रिभाषा सूत्र आलं, हे सूत्र देशातील किती राज्यांत राबवलं जातं? गुजरातमध्ये हिंदी शिकवलं जातं का, शिकवत असाल तर आम्हाला त्याची ना नाहिये. त्रिभाषा जर असेल तर कर्नाटकात आमचे लोक मराठी बोलतात तर त्यांच्यावर गुन्हे दाखल का होतात? त्यांना कानडीची सक्ती का केली जाते. त्यांच्यावर राजद्रोहाचे गुन्हे का टाकले जातात. तेव्हा कुठे जातं तुमचं सूत्र? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला.

देशात संघराज्य पद्धती आहे. प्रत्येक राज्याला आपली भाषा आहे. मग त्रिभाषा सूत्र का पंचभाषी सूत्र 20 भाषी सूत्र राबवा. सक्तीवाचून कुणाचं अडत नाहिये तर तुम्ही ही जबरदस्ती का करत आहात. म्हणजेच नड्डा म्हणाले होते की एक पक्ष राहणार तसे एकाधिकारशाही राहणार अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली.