जनतेने जागे झाले पाहिजे आणि ढोंगी हिंदुत्व संपले पाहिजे, ‘रामरक्षा’ चळवळ ही त्याची सुरुवात आहे – संजय राऊत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आमच्या आंदोलनाला भाजप जर प्रत्युत्तर देत असेल तर याचा अर्थ ते लुटीचं समर्थन करत आहेत. आम्ही रामाची भक्ती करत आहोत. राम मंदिराच्या देणगी घोटाळ्यावर आम्ही बोलत आहोत. त्यावर जर तुम्ही प्रत्युत्तर आंदोलन करत असाल तर तुम्ही मूर्ख आहात. त्यामुळेच हिंदूंना जागृत करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली १८ जुलै रोजी होणाऱ्या कार्यक्रमासाठी आम्ही नागपूरची निवड केली आहे, असे शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी सांगितले.

हिंदूंना जागृत करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली १८ जुलै रोजी होणाऱ्या कार्यक्रमासाठी आम्ही नागपूरची निवड केली आहे. ‘रामरक्षा’ चळवळीची सुरुवात मुंबईत झाली. अयोध्येतील राम मंदिर आणि इतर अनेक मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणावर लूट झाली आहे, हे सर्वांनाच माहित आहे. मंदिरांत मोठ्या प्रमाणात देणगी घोटाळा झाला आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे, असे संजय राऊत म्हणाले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) बेळगाव येथील बैठकीत राम मंदिरातील कथित देणगी घोटाळ्याबाबत चिंता व्यक्त केली होती. परंतु हे प्रकरण इथेच संपणार नाही. मुख्य आरोपी अजूनही मोकाट आहेत आणि त्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बद्रीनाथ आणि केदारनाथ मंदिरांमध्येही घोटाळे आणि लूट झाली आहे. ‘रामरक्षा’ चळवळीच्या माध्यमातून आम्हाला लोकांना जागृत करायचे आहे आणि हे ढोंगी हिंदुत्व संपले पाहिजे, हा संदेश जनतेपर्यंत पोहचवायाचा आहे, असे संजय राऊत म्हणाले.

उद्धव ठाकरे १८ जुलै रोजी सायंकाळी ४:३० वाजता या कार्यक्रमात सहभागी होतील. आम्ही याला आंदोलन म्हणत नाही, तर समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न म्हणतो. आम्ही सर्वांना निमंत्रित करत आहोत. ही केवळ एका राजकीय पक्षाची चळवळ नाही. आम्ही पुढाकार घेतला असला, तरी आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही निमंत्रित करत आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहिल्यास त्यांनीही आपली भूमिका स्पष्ट करावी. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), काँग्रेस आणि इतर सर्वांना निमंत्रित करत आहोत. सर्वांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहनही संजय राऊत यांनी केले.