
”जो मास्टरप्लॅन धारावीकरांना मान्य असेल तोच प्लॅन मी मानेन नाहीतर इतर कुठल्या प्लॅनची मी होळी केल्याशिवाय राहणार नाही’, अशा शब्दात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजपला ठणकावून सांगितले आहे. आदित्य ठाकरे यांनी बुधवारी धारावीतील शाखा क्रमांक 184 ला भेट दिली. यावेळी त्यांनी तिथे मोठ्या संख्येत उपस्थित असलेल्या धारावीकरांशी संवाद साधला.
”वर्षानुवर्ष तुम्ही ज्या धारावीत राहिला आहात त्याचा विकास झालाच पाहिजे. विकास होत असताना परवा जो प्रश्न विचारला तो आज मी तुम्हाला सगळ्यांना विचाररला आहे. विकास कुणाचा पाहिजे, धारावीचा की अदानीचा, घरं धारावीकरांना मिळाली पाहिजे की अदानीला. याचं उत्तर जेव्हा तुमच्या मनात स्पष्ट होईल तेव्हा या लढ्याला ताकद येईल. जे पिढ्यानपिढ्या इथे राहत आले आहेत मला त्यांना विचारायचं आहे. हा लढा आता सर्वात मोठा लढा असणार आहे. हा काही फक्त धारावीचा राहिलेला नाही. हा महाराष्ट्राचा लढा झाला आहे. संयुक्त महाराष्ट्रासाठी माझे पंजोबा आजोबा लढले होते. तसे आता आताच्या मुंबईसाठी आताच्या महाराष्ट्रासाठी उद्धव ठाकरे आणि मी लढत आहोत, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
”जी मुंबई तुम्ही मेहनत करून मोठी करत आहात. ती मुंबई तुम्ही अदानी समुहाच्या हातात देणार आहात का? भाजपवाले बोलतायत ही हे टेंडर उद्धव ठाकरेंच्या काळात निघालं. हे खोटं आहे. आपण टेंडर काढत होतो पण आपल्या काळात विकास झाला असता तर धारावी काय मुंबई काय आपण अदानीच्या घशात घालू दिली नसती. तुमचा विकास तुमच्यासाठीच झाला असता. हे टेंडर ऑक्टोबर 2022 चं आहे. या टेंडरमध्ये आणि फडणवीसांनी मंजूर केलेला मास्टरप्लान मंजूर होत असताना किती धारावीकर त्यांच्या बाजूला बसलेल्या. त्या गुप्त मिटिंग होत्या. कारण त्या मास्टरप्लॅनमध्ये 2000 पर्यंत जे इथे राहत होते त्यांनाच इकडे पुनर्विकासाचं घर मिळेल. 25 वर्षापूर्वी जे इथे राहत होते त्यांनाच घरं मिळतील. बाकीच्यांना घाटकोपर, मुलुंड, देवनारमध्ये कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर पाठवणार आहेत. ही आपली किंमत आहे का ? मुंबईला हे गिळायला निघाले आहेत. देवनारचे डंपिंग ग्राऊंड यांनी महापालिकेकडून ढापून घेतलं. अदानीने सांगितलं त्यांना इकडच्या लोकांना तिथे बसवायचं आहे. डंपिंग ग्राऊंड स्वच्छ करायला तीन हजार कोटी लागतील ते देणार कोण? तर ते मुंबईकरांकडून घेणार. मुंबई महापालिका म्हणजे BMC जी भाजप चालवत आहेत. ती महापालिका आता प्रत्येकावर कचरा कर लावणार. एवढे वर्ष मुंबईत राहत आहात. आपण पालिकेत असताना आतापर्यंत कुणी कचरा कर लावले होते का? पहिल्यांदा भाजप आपल्यावर कचरा कर लावणार नाही. प्रॉपर्टी टॅक्स लावत आहेत. उद्धव ठाकरे यांचं एकमेव सरकार होतं ज्यांनी कचरा कर लावला नव्हता. 500 फूटांपर्यंतची घरं करमुक्त केली होती. भाजप व भाजपचे मालक मुंबईला लुटायला निघाले आहेत. लाखो लोकांना देवनारच्या डंम्पिंग ग्राऊंडला नेणार. अदानी धारावीकरांना मिठागरावर, कचऱ्यावर नेऊन ठेवणार आहे. आता मी इथे आल्यावर अदानीचे दलाल गल्ली गल्लीत जातील, तुम्हाला पैसे देतील विकत घेण्याचा प्रयत्न करतील. विकले जायचं की नाही हे तुमच्या हातात आहे. दरवाजा कुणाच्या तोंडावर बंद करायचा हे आपण ठरवायचं आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
”उद्धव ठाकरे यांनी बीडीडी चाळींचा जसा विकास केला तसा धारावीचा करून दाखवायचा आहे. वरळीत दहा हजार परिवार आहेत, वडाळ्यात अडीच हजार परिवार व ना म जोशी मार्ग येथे अडीच हजार परिवार आहेत. 160 चौरस फूटाच्या घरात राहत होते. तिथे 2021 पर्यंत राहणाऱ्या सर्वांना पात्रता दिली व पुर्नविकासाचं काम सुरू केलं. आता त्यांना आपण 500 चौरस फुटाचं घर फुकटात देत आहोत. बीडीडीमध्ये जसा आम्ही म्हाडाच्या मार्फत विकास करत आहोत. तसा इथला विकास झाला पाहिजे. भलेही तुम्ही कॉन्ट्रॅक्टर अपॉइंट करा पण फायदा हा सरकारला झाला पाहिजे अदानीला नाही. प्रत्येकाला पात्रता द्या. सगळ्यांना पात्र करा. कुणाला एकालाही धारावीच्या बाहेर पाठवू नका. ग्राऊंड प्लस वनला पात्र कररा. त्याला मी विकास मानेन नाहीतर मी एक फूट देखील मागे हटणार नाही. इथे जेव्हा विकास व्हायला सुरुवात होईल. अदानीचे टॉवर यायला लागतील ते दीड हजार स्क्वेअर फूटची घरं मिळतील. आणि धारावीकरांना साडे तीनशेची घरं मिळणार. या धारावीसाठी अदानीच्या घशात मुंबईचे सोळाशे एकर टाकत असतील तर प्रत्येक धारावीकराला पाचशे स्क्वेअर फुटाचं घर मिळायलाच पाहिजे. यासाठी आपण लढणार आहोत. अदानीने इथे येऊन सांगितलं पाहिजे, कुंभारवाडा जाणार कुठे, कोळीावाडा जाणार कुठे, आमच्या मायक्रो इंडस्ट्रीज जाणार कुठे. जो मास्टरप्लॅन धारावीकरांना मान्य असेल त्यालाच मी प्लॅन मानीन नाहीतर त्या प्लॅनची होळी केल्याशिवाय मी राहणार नाही, असेही आदित्य ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.