
बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पामधील मृत गाळेधारकांच्या वारसांना ‘वारसा प्रमाणपत्रे’ तातडीने द्या, अशी मागणी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना पत्र दिले आहे.
‘म्हाडा’ प्राधिकरणाच्या माध्यमातून सध्या बीडीडी चाळींचा पुनर्विकास सुरू आहे. मात्र बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील मृत गाळेधारकांच्या वारसांना ‘वारसा प्रमाणपत्र’ मिळवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागात हेलपाटे मारावे लागत आहेत. त्यामुळे वारसदारांची गैरसोय होत आहे. शिवाय बऱ्याचदा त्यांची फसवणूकही होत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने एक धोरण तयार करावे, अशी मागणीही आदित्य ठाकरे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी ‘एक्स’वर माहिती दिली आहे.
‘एक खिडकी’ योजना सुरू करा
‘म्हाडा’ व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या विद्यमाने अधिकृत ‘एक खिडकी’ योजना सुरू करावी आणि या योजनेंतर्गत वारसदारांना एकाच ठिकाणी सर्व आवश्यक माहिती, मार्गदर्शन आणि कागदपत्रांची पूर्तता करण्याची सुविधा द्यावी. जेणेकरून वारसदारांची गैरसोय दूर होईल, अशी मागणीही आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
वरळी पोलीस वसाहतीत कायमस्वरूपी जलकुंभ उभारा!
वरळी येथील पोलीस कॅम्पमधील पाणीपुरवठय़ासाठी असलेला जलकुंभ धोकादायक झाल्यामुळे तो पाडण्यात आला. त्या जागी पाणीपुरवठय़ासाठी 20 प्लॅस्टिकच्या टाक्या बसवण्यात आल्या होत्या, मात्र या टाक्यांपैकी 12 टाक्या फुटल्या आहेत. त्यामुळे पाणीपुरवठय़ाची समस्या निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर या परिसरातील पाणीपुरवठय़ाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी पूर्वीप्रमाणे कायमस्वरूपी सिमेंटचा जलकुंभ उभारून रहिवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी शिवसेना नेते-युवासेना प्रमुख-आमदार आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. वरळी विधानसभा मतदारसंघात वरळी पोलीस कॅम्प इमारत क्र. 1 ते 36 या सरकारी पोलीस वसाहतीकरिता पाणीपुरवठय़ासाठी 10 लाख लीटर क्षमतेचा सिमेंट काँक्रीटचा जलकुंभ होता. परंतु पाणी वापरासाठी धोकादायक झाल्यामुळे तो पाडण्यात आला. त्याऐवजी तात्पुरता उपाय म्हणून सिंटेक्सच्या 20 टाक्या बसवण्यात आल्या. परंतु या 20 टाक्यांपैकी 12 टाक्या फुटलेल्या स्थितीत असल्याने गैरसोय होत असल्याचे आदित्य ठाकरे यांनी निदर्शनास आणून दिले आहे.