विश्लेषण कमी अन्… ‘मिस्टर 360’ एबी डिव्हिलियर्स समालोचकांवर भडकला, RCB vs LSG लढतीदरम्यान काय घडलं?

इंडियन प्रीमियर लीगच्या 18व्या हंगामातील अखेरचा साखळी सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनऊ सुपर जायंट्स संघात पार पडला. धावांचा पाऊस पडलेल्या या लढतीमध्ये बंगळुरूने विजय मिळवला. या लढतीदरम्यान बंगळुरूच्या गोलंदाजांबाबत नकारात्मक टिप्पण्या करणाऱ्या समालोचकांचा आरसीबीचा माजी खेळाडू एबी डिव्हिलियर्स याने खरपूस शब्दांमध्ये समाचार घेतला. ‘एबीडी 360’ या आपल्या साप्ताहिक शोमध्ये त्याने नावाचा उल्लेख न करता समालोचकांवर निशाणा साधला.

एकाना मैदानावर झालेल्या लढतीत लखनऊने बंगळुरूच्या गोलंदाजांची धुलाई करत 228 धावा चोपल्या. लखनऊने विजयासाठी दिलेले 229 धावांचे आव्हान बंगळुरूने विराट कोहली आणि जितेश शर्माच्या अर्धशतकीय खेळीच्या बळावर 8 चेंडू बाकी असताना लिलया पार केले. यंदाच्या हंगामातील बंगळुरूचा हा नववा विजय ठरला आणि बंगळुरूने टॉप-2मध्ये जागा फिक्स केली. विशेष म्हणजे 2016 नंतर पहिल्यांदाच बंगळुरूने टॉप-2मध्ये स्थान पक्के केले. आता क्वालिफायल 1 मध्ये बंगळुरूचा सामना पंजाब किंग्जसोबत 30 मे रोजी होईल.

लखनऊविरुद्ध झालेल्या लढतीदरम्यान समालोचकांनी बंगळुरूच्या गोलंदाजांवर टिप्पणी केली होती. याचा समाचार घेताना एबी डिव्हिलियर्स म्हणाला की, काल रात्री मी समालोचकांची टिप्पणी ऐकली आणि खरे सांगायचे तर मला राग अनावर झाला. आरसीबीची गोलंदाजी सुरू असताना समालोचक खूप नकारात्मक टिप्पणी करत होते. आरसीबीच्या गोलंदाजीवर दबाव आहे, ते परिस्थिती हाताळू शकत नाही. फॉर्ममध्ये असलेला संघ लय गमावत आहे वगैरे… पण हुशार आणि तीक्ष्ण समालोचकांनी असा विचार केला नाही की कदाचित खेळपट्टी फलंदाजांसाठी पोषक आहे का? प्रत्येकवेळी जुनाच नरेटिव्ह चालवला जातो की आरसीबीचे गोलंदाज फेल झाले. पण हे विश्लेषण कमी आणि आळशी विचारसरणी आहे.

रोहित शर्मानं ‘वजन’ वापरलं अन् चक्र फिरली; BCCI नं यू टर्न घेत महिन्याभरापूर्वी हटवलेल्या कोचला परत बोलावलं

आरसीबीचे गोलंदाज खराब फॉर्ममध्ये असल्याचे समालोचक बोलत होते. पण मला असे वाटते की ते जुनेच नरेटिव्ह मांडत आहेत. आरसीबीने कधीही विजेतेपद पटकावलेले नाही, परंतु मैदानात काय घडतेय याचे योग्य विश्लेषण करण्याऐवजी नकारात्मक टिप्पण्या करणे हे आळशीपणाचे लक्षण आहे. कारण याच खेळपट्टीवर ऋषभ पंत यानेही 60 चेंडूत 118 धावा काढल्या आहेत. याच विकेटवर दोन्ही संघांनी 450हून अधिक धावा चोपल्या आहेत. याचाच अर्थ ही खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक होती, असेही एबी डिव्हिलियर्स म्हणाला.

तो पुढे म्हणाला की, आरसीबीचा संघ आता कोणत्याही सुपरस्टारवर अवलंबून नाही. विराट कोहली किंवा ख्रिस गेल यांच्यावर संघ अवलंबून असायचा. पण आत अनेक खेळाडू पुढे येत आहेत ही या हंगामातील सकारात्मक बाब आहे. संपूर्ण संघ एकजुटीने खेळत आहे, असेही एबी डिव्हिलियर्स म्हणाला.